पोलीस निरीक्षकांनी गुहागरवासीयांचे आभार मानले
गुहागर, ता. 12 : राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसावरुन वातावरण ढवळून निघाले. मात्र गुहागरमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्व धर्मिय मंडळींनी सहकार्य केले. कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाद पोचेल असे किंचितही वातावरण निर्माण झाले नाही. त्याबद्दल गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक बी. के. जाधव यांनी तालुकावासीयांचे आभार मानले आहेत. Police Inspector thanks Guhagar residents


याबाबत जाधव यांनी सांगितले की, तालुक्यात 25 मशिदींवर भोंगे होते. मात्र तेथील व्यवस्थापनाने सहकार्य केले. पहाटे होणारी अजान आता लाऊडस्पिकरवरुन होत नाही. दिवसा होणारी अजानचा आवाजही कमी ठेवण्यात आला आहे. तालुक्यात काही ठिकाणी मंदिर विशेषत: हनुमान मंदिर आणि मशिदीमधील अंतर कमी आहे. अशा ठिकाणी हनुमान चालिसा पठण होईल अशी शक्यता होती. त्यासाठी आम्ही संबंधितांना भेटलो. संवाद साधला. त्यांनी देखील समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करणार नाही. असे स्वखुशीने सांगितले. राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी होतील अशी शक्यता लक्षात घेवून सर्व पक्षीय कार्यकर्ते, तालुक्यातील प्रमुख मंडळींजवळ चर्चा केली. त्यांनी देखील सहकार्याचीच भुमिका घेतली. Police Inspector thanks Guhagar residents


त्यामुळे गुहागर तालुक्याची शांत, संयमी अशी ओळख आहे ती तालुकावासीयांनी सार्थ ठरवली आहे. याबद्दल तालुकावासीयांना धन्यवाद. यापुढेही दोन समाजात तेढ निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेला अडचण होईल असे कृत्य कोणाकडून घडू नये. अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली. Police Inspector thanks Guhagar residents