• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 November 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारतीय लष्कराचा तिसरा डोळा; ‘रुद्र ब्रिगेड, भैरव बटालियन’

by Guhagar News
November 6, 2025
in Old News
53 1
0
Indian Army
104
SHARES
298
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, न्यूज : भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्रचना प्रयत्न आज केवळ सैन्यबल वाढवण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते भारताच्या सामरिक स्वायत्ततेचे आणि प्रादेशिक नेतृत्वाचे प्रतिबिंब आहेत. संरक्षण मंत्रालयाने २०२५ हे वर्ष ‘सुधारणा वर्ष’ (Year of Reforms) म्हणून घोषित केले असून, त्याअंतर्गत भारतीय सैन्यात “रुद्र ब्रिगेड्स” आणि “भैरव बटालियन्स” या नव्या रचना अस्तित्वात येत आहेत. Indian Army

या युनिट्सचा उद्देश आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपानुसार तंत्रज्ञान, माहिती आणि मनुष्यबळ यांचा एकत्रित वापर करून गतिशील प्रतिसाद क्षमता निर्माण करणे हा आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या संरचनात्मक प्रतिस्पर्ध्यांकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार करून भारतीय सेना डॉक्ट्रिनल आणि ऑपरेशनल दोन्ही स्तरांवर स्वतःला पुनर्रचित करत आहे. हा लेख या दोन्ही नव्या सैन्य घटकांच्या (Rudra Brigade आणि Bhairav Battalion) स्थापनेची पार्श्वभूमी, त्यांचे कार्य, तसेच भारताच्या दीर्घकालीन संरक्षण धोरणात त्यांचे स्थान याचे सखोल विश्लेषण करतो. Indian Army

युद्धात आवश्यक असते, ती गतिमानता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गतिमान आणि चपळ हालचालींनी शत्रूला अनेकदा चारीमुंड्या चीत करून युद्धात जय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या कारगिल विजयदिनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘रुद्र’ ब्रिगेड, ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’, ‘शक्तिबान आर्टिलरी रेजिमेंट’, ड्रोनच्या विशेष प्लाटूनची घोषणा केली. युद्ध अधिक चपळ, गतिमान यामुळे होईल आणि मारक क्षमताही वाढेल. दहशतवाद्यांविरुद्धची लढाई अधिक संहारक, अचूक आणि शत्रूची नुकसान करणारी ठरणार आहे. Indian Army

भारतीय सैन्याने चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपली लष्करी रचना अधिक गतिमान, तंत्रआधारित आणि एकात्मिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘रुद्र’ ब्रिगेड’ आणि ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’ सारख्या एकात्मिक घटकांची रचना केली जात आहे. ज्यात इन्फॅन्ट्री, मेकेनायझ्ड युनिट्स, तोफखाना, टँक, विशेष दल आणि ड्रोन/अनमॅन्ड युनिट्स यांना एका छत्राखाली एकत्रित केले जाईल. या बदलाचा उद्देश वेगवान तैनाती, लवचिक युद्धक्रिया, स्वयंपूर्ण लॉजिस्टिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा (ड्रोन, एआय-आधारित बुद्धिमत्ता, वास्तविक-वेळ माहिती) समावेश करून विविध भूभाग,  सपाट मैदान ते पर्वतीय रेषा, यासाठी तातडीने प्रभावी प्रतिसाद देण्यास सक्षम होणे हा आहे. Indian Army

हे केवळ संरचनात्मक बदल नाहीत, तर पारंपरिक साच्यांना मोडून आधुनिक युद्धपरिस्थितीशी जुळवून घेण्याची रणनीती आहे. रांवा-तयारी, एकात्मिक क्रियाशीलता आणि संसाधनांचा अधिक प्रभावी वापर या माध्यमातून साध्य होण्याची अपेक्षा आहे. परिणामी भारतीय सैन्य अधिक वेगाने आणि बहुध्रुवी पद्धतीने अडचणींचा सामना करू शकेल. भारताने पाकिस्तानविरुद्ध राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले असले, तरी या आधुनिक युद्धपद्धतीची तयारी दीर्घ काळापासून सुरु आहे. २०१४ साली राष्ट्रप्रेमी सरकार सत्तेत आल्यापासून तिन्ही दलांतील समन्वय वाढण्याकडे लक्ष दिले गेले आहे. संरक्षण दलप्रमुख पदाची (सीडीएस) निर्मिती होण्याबरोबरच सायबर आणि अचूक हल्ले करण्याच्या तंत्रातही आपण मोठी प्रगती केली आहे. Indian Army

‘रुद्र’ ब्रिगेडसह ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’सह इतर बदलांची जी घोषणा झाली, ती पाहता दीर्घ काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त रूप मिळाले आहे. सैन्याला सीमेवर गतीने आणण्यासंदर्भात आणि मर्यादित युद्धपद्धतीच्या दृष्टीने सैद्धांतिक पातळीवरील चर्चेला २० वर्षांपूर्वीच सुरुवात झाली. इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप, आयबीजी तयार करण्याचा विचार दीर्घ काळापासून होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चालू वर्ष हे संरक्षण दलांतील बदलांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्या दृष्टीने येत्या काळात आणखी बदल आपल्याला दिसून येणार आहे. Indian Army

‘रुद्र’ ब्रिगेड, ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘रुद्र’ ब्रिगेडमध्ये पायदळ, चिलखती दल, रणागाडे, तोफा, विशेष कमांडो, अभियंते, सिग्नल युनिट्स असे सर्व काही एकाच ठिकाणी असेल. शत्रू प्रदेशात जलद घुसणे त्यामुळे सोपे जाणार आहे. सध्याच्या ‘सिंगल आर्म ब्रिगेड’चे रूपांतर ‘ऑल आर्म ब्रिगेड’मध्ये होणार आहे. एरव्ही युद्धसरावावेळी किंवा प्रत्यक्ष युद्धावेळी एकत्र येणाऱ्या या ब्रिगेड आता कायमस्वरूपी एकत्र असतील. ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’ ही विशेष कमांडोंनी सज्ज असेल. शत्रू प्रदेशात छुपी कारवाई करायची असेल, तर ही बटालियन त्यासाठी उपयुक्त ठरेल. अत्याधुनिक शस्त्रांनी या बटालियन सज्ज असतील. शत्रूला आश्चर्यचकित करणे, अचानक शत्रूवर तुटून पडणे यासाठी हे कमांडो निष्णात असणार आहे. Indian Army

शक्तिमान आर्टिलरी रेजिमेंट

या रेजिमेंट ‘दिव्यास्त्र बॅटरी’ने म्हणजेच तोफांसह इतर अस्त्र शस्त्राने सुसज्ज असणार आहेत. शत्रूवर अचूक हल्ला करणे, मानवरहित विमानांनी टेहळणी करणे, शत्रूवर दारुगोळ्याचा जबरदस्त मारा करणे आदींसाठी ही रेजिमेंट सज्ज असेल. सीमेपलीकडील हल्ल्यासाठी ही रेजिमेंट सज्ज असणार आहे. Indian Army

‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन पराक्रम’ राबविले होते. दोन्ही देशांत तेव्हा युद्ध झाले नसले, तरी युद्धाचे वातावरण तयार झाले होते. या ‘ऑपरेशन पराक्रम’अंतर्गत लष्कर सीमेवर आणण्यात आले. मात्र, लष्कराची सीमेवर जमवाजमव करण्यात जितका वेळ गेला, ते पाहता ‘आयबीजी’ अर्थात ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ची संकल्पना पुढे आली.

ऑर्डनन्स फॅटरीचे कॉर्पोरेटायझेशन

२०२१ मध्ये १०० वर्षे जुना ऑर्डनन्स फॅटरी बोर्ड (ओएफबी) विसर्जित करून त्याऐवजी सात संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (डीपीएसयू) स्थापन करण्यात आले. उद्दिष्ट होते जबाबदारी वाढवणे, कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि या संस्थांना खासगी उद्योगांसोबत स्पर्धा करण्यास सक्षम करणे. कॉर्पोरेटायझेशनमुळे या कंपन्यांना स्वतःच्या उत्पन्नावर व्यवसाय चालवावा लागतो. प्रारंभी काही अडचणी विशेषतः कर्मचारी संक्रमण आणि खरेदी पुनर्रचनेत असल्या, तरीही यामुळे ओएफबीची दशकांपासूनची कामगिरीतील कमतरता आणि नोकरशाहीची अकार्यक्षमता संपुष्टात आली. Indian Army

थिएटर कमांड्स

म्हणजेच विशिष्ट भौगोलिक किंवा कार्यात्मक क्षेत्रासाठी लष्कर, नौदल आणि वायुसेनेची संसाधने एकत्रित करणारे संरचना या प्रस्तावात प्रगती झाली आहे. काही मतभेद असूनही दोन कमांड्स (सागरी आणि हवाई संरक्षण) अंतिम टप्प्यात आहेत. यांची अंमलबजावणी झाल्यास भारत आधुनिक संयुक्त युद्धसिद्धांताकडे झेप घेईल.

भारतीय सैन्यदलांची आत्मनिर्भरतेकडे जोमाने वाटचाल

स्वातंत्र्यानंतर संरक्षण क्षेत्रात अगदी अलिकडेपर्यंत आपली प्रगती कुर्मगतीनेच सुरू होती. आता स्वदेशीवर भर देताना तिन्ही संरक्षण दले अधिकाधिक सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी किचकट आणि वेळखाऊ असलेल्या शस्त्रास्त्रे खरेदी कार्यपद्धतीतही सुधारणा झाल्याने भारताचा आत्मनिर्भरतेकडे वेगवान प्रवास सुरू आहे. गेले दशक भारताच्या संरक्षण क्षेत्रात संरचनात्मक, प्रक्रियात्मक आणि धोरणात्मक सुधारणांच्या दृष्टिकोनातून सर्वार्थाने क्रांतिकारी ठरले. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणापासून ते आत्मनिर्भरतेकडे वाटचालीपर्यंत, २०१४ पासून मोदी सरकारच्या कारकिर्दीत भूतकाळातील पद्धतींपासून वेगळे ठाम पाऊल उचलून राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि कठीण परिस्थितीतून सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनला ७,१४६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत जे २०२४-२५ च्या तरतूदीपेक्षा ९.७४ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी BROसाठी केलेली आर्थिक तरतूद अरुणाचल प्रदेशातील एलजीजी – दामतेंग – यांगत्से, जम्मू काश्मीर मधील आशा-चीमा-अनिता आणि राजस्थानमधील बिरधवाल-पुग्गल-बज्जू सारखे बोगदे, पूल आणि रस्ते बांधून सीमावर्ती भागात राष्ट्राच्या धोरणात्मक हित, सामाजिक,आर्थिक विकास तसेच रोजगाराच्या संधी आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. Indian Army

आधुनिकतेकडे वाटचाल

२१ व्या शतकातील दृश्य-अदृश्य अशा सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत सरकारने २०२५ हे सैन्य सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. आपला देश सध्या ८५ देशांना शस्त्रे पुरवत आहे. २०१६ च्या तुलनेत भारताच्या संरक्षण निर्यातीत १० पट वाढ झाली आहे.  नौदलासाठी २६ राफेल विमाने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. 31 MQ-9B रीपर ड्रोन खरेदी करण्यासाठी अमेरिकेसोबत करार केला. भारत आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे स्ट्रायकर आर्मर्ड लढाऊ वाहन तयार करण्याचे मान्य केले. Indian Army

Tags: GuhagarGuhagar NewsIndian ArmyLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share42SendTweet26
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.