गुहागर, ता. 5 : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांची संख्या 70 वरुन 350 वर मी नेली आहे. हे अभ्यासक्रम अशा संस्थांनी सुरु करावेत. तर गावागातील मुलांपर्यंत व्यवसायाभिमुख शिक्षण पोचले. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांनी केले. ते शृंगारतळी येथे रिगल कॉलेजच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. Inauguration of Regal College
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे रिगल कॉलेज स्थापन झाले आहे. या महाविद्यालयात रत्नागिरी जिल्ह्यात अन्यत्र उपलब्ध नसलेले उद्योग व्यवस्थापन, संस्कृत विशारद, लोकप्रशासन, इव्हेंट मॅनेजमेंट हे कोर्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय हॉटेल व्यवस्थापन, नर्सिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, असे ही विषय शिकवीले जाणार आहेत.


Inauguration of Regal College
या महाविद्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांनी केले. यावेळी पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी जि.प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष रियाझ ठाकूर, कालिदार विद्यापीठाचे संचालक दिनकर मराठे, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, डॉ. सुनिता शिर्के, प्राचार्या रेश्मा मोरे, प्राध्यापिका समिरा नरवणकर आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे श्रीफळ वाढवून आणि फीत कापून नाम. उदय सामंत यांनी उद्घाटन केले. महाविद्यालयाच्या इमारतीची पहाणी सामंत आणि मान्यवरांनी केली. उद्घाटन सोहळ्याच्या सुरवातील 10 बचत गटांची स्थापना करणाऱ्या सौ. साक्षी भेकरे आणि नूतन महाविद्यालयाच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांचा सत्कार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.


या उद्घाटन सोहळ्यात बोलताना नाम. उदय सामंत म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण खाते असल्याने महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात फिरतो. अत्यंत दिमाखदार इमारती आणि सर्व पायाभूत, भौतिक सेवांनी युक्त अशा महाविद्यालयात मिळणारे शिक्षण आणि ग्रामीण भागातील छोट्या महाविद्यालयातून मिळणारे शिक्षण याच्या गुणवत्तेमध्ये फरक नाही. कला, वाणिज्य, शास्त्र या पलिकडे जावून थेट व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची आज ग्रामीण भागाला जास्त गरज आहे. शिक्षण मंत्री झाल्यानंतर अशा संस्थांना पूर्ण प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागातील संस्था यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निस्वार्थपणे या संस्थांना मदत करणे आवश्यक आहे. Inauguration of Regal College
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषत: ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभ्या करणे हे कठीण काम आहे. शिक्षण मंत्री म्हणून मला स्वत:ला रत्नागिरी जिल्ह्यात अनेक संस्था उभ्या करता आल्या असता. मात्र तशा संस्था उभ्या न करता शासनाद्वारे किंवा अन्य शैक्षणिक संस्थांना परवानग्या देण्याचे काम मी केले. ग्रामीण भागातील संस्थांनी माझ्या खात्याशी संबधित कामे घेवून थेट माझ्याकडे यावे. अशी कामे विनाविलंब करण्याचा प्रयत्न मी निश्चित करतो. मात्र मध्यस्थाला पाठवू नका. मध्यस्थाची कामे मी करत नाही. कारण मध्यस्थाकडून काम करुन घेतले की हा मध्यस्थच पुढे मालक बनतो. मंत्री उदय सामंत यांना पुन्हा हॅलिकॉप्टरने मुंबईत जायचे असल्याने भाषण संपविल्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
त्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, रिगल एज्युकेशन सोसायटी आज कल्याणपर्यंत पोचली आहे. रिगल महाविद्यालयातील अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी मिळेलच त्याचबरोबर व्यवसायाची संधीही मिळणार आहे. इथे प्रशिक्षण घेवून तरुणांनी पर्यटन उद्योग संलग्न व्यवसाय सुरु करावेत. कोरोनाच्या काळात ज्यांनी पदव्या घेतल्या त्यांना भविष्यात अडचणी कळतील. तेव्हा ऑनलाईनच्या मागे पालक आणि विद्यार्थ्यांनी लागु नये. Inauguration of Regal College


माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर म्हणाले की, गुहागर तालुक्यात पूर्वी उच्च शिक्षणासह तंत्रशिक्षणाची सुविधाच नव्हती. शासनाच्या माध्यमातून आयटीआय सुरु झाले. आता रिगल कॉलेजद्वारे व्यावसायिक शिक्षण सुरु केले आहे. छोट्या तालुक्यात अशी महाविद्यालये उभी करणे खर्चिक आहे. ग्रामीण भागातील मुलांनी व्यवसाय कसा करता येईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेतले पाहिजे. आज त्याची संधी या महाविद्यालयाच्या निमित्ताने गुहागर तालुक्याला मिळाली आहे.
गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी संजय शिर्के आणि रिगल परिवाराला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, विविध क्षेत्रात यशस्वी काम संजय शिर्के करत आहेत. त्यांच्या सर्व महाविद्यालयांमधुन जवळपास 70 कार्य विभागांचे शिक्षण दिले जात आहे. गुहागर तालुक्याचा विचार केला तर कै. तात्या नातू, रामभाऊ बेंडल आणि सदाशेठ आरेकर त्यानंतर बाईत यांनी इथे शिक्षणाचा विचार रुजविला. दहावी बारावी नंतर नोकरीची संधी किंवा चटकन व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणारी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था गुहागरात उभी रहाणे आवश्यक होते. आज ते काम संजय शिर्के यांनी केले आहे. त्याचा लाभ आता तालुक्यातील युवक युवतींनी घ्यावा. Inauguration of Regal College
कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपुरच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक दिनकर मराठे यांनी संस्कृत काव्यातून शुभेच्छा दिल्या. कालिदास विद्यापीठाला आता ए+ दर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय भाषण करताना रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के म्हणाले की, शृंगारतळी परिसरात महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला त्याचा आनंद होतोय. माफक फीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी काही समविचारी मित्रांनी एकत्र येवून रिगल एज्युकेशन सोसायटी सुरु केली आहे. इथे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायाची 100 टक्के हमी आम्ही देतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिगल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सुनिता शिर्के यांनी केले. प्राचार्या पुर्वा मोरे यांनी शृंगारतळी महाविद्यालयात शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. तर प्राध्यापिका समिरा नरवणकर यांनी सर्वांचे आभार मानले.