एस.टी. महामंडळाचा इंडियन ऑईलसोबत करार, राज्यातील ३० आगारात उभे रहाणार पेट्रोलपंप
गुहागर : एस. टी. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी इंडियन ऑईल बरोबर करार केला आहे. या कराराद्वारे राज्यातील 30 आगारांमध्ये पेट्रोल, डिझेल, एलएनजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. जर असा व्यवसाय एस.टी. महामंडळ करत असेल तर गुहागर आगारामध्ये लवकरात लवकर पेट्रोल, डिझेल विक्रीस उपलब्ध करुन द्यावे. अशी मागणी शहरातून होत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे,. त्यासाठी एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑईलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी.पंप (liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. सदर पेट्रोल डिझेल पंप / एल. एन. जी. पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार आहेत. त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल. जो एस.टी.चा नफा वाढवेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
राजापूर आणि रत्नागिरी या दोन आगारांची निवड
या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि रत्नागिरी या दोन आगारांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती गुहागरपर्यत पोचल्यावर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. गुहागर शहरवासीयांनी एस.टी.च्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच राजापूर, रत्नागिरी सोबत गुहागर आगाराचीही निवड करावी. अशी मागणी शहरातून होत आहे.
तालुकास्थान असून गुहागरात पेट्रोलपंप नाही
गुहागर शहर तालुकास्थान आहे. जिल्ह्यातील अन्य तालुकास्थानांचा विचार केला तर गुहागर सोडून मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्र्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या प्रत्येक तालुकास्थानी पेट्रोलपंप आहे. गुहागरात मात्र तालुकास्थानापासून 10 कि.मी. अंतरावर शृंगारतळी येथे पेट्रोलपंप आहे. आज पर्यटनस्थळ म्हणूनही गुहागरची ओळख बनली आहे. त्यामुळे विविध कामांसाठी गुहागरमध्ये येणाऱ्या तालुकावासीयांची संख्या मोठी आहे. सप्टेंबर ते मे या कालावधीतील प्रत्येक शनिवार, रविवार गुहागर शहर पर्यटकांनी फुलून जाते. याशिवाय असगोली, आरेगांव, रानवी, पालशेत, वरवेली आदी गावांना गुहागर हे नजिकचे गावं आहे. या मुद्द्यांचा विचार केला तर गुहागर आगारातील पेट्रोलपंप आगाराचा नफा वाढवेलच. सोबत गुहागरच्या विकासालाही मोठा हातभार लावेल. येथे येणाऱ्या पर्यटकांना इंधन कोठे भरावे याची चिंता लागून रहाणार नाही. व्यापारी, दुकानदार, छोटे उद्योजक, रिक्षाचालक मालक, तालुक्यांतर्गत माल वहातुक करणारे छोटे टेम्पो चालक मालक यांना मुद्दाम इंधन भरण्यासाठी शृंगारतळीत जावे लागते. त्यांचा पैसा वाचेल. त्यामुळे गुहागर आगारातही पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपाची सुविधा व्हावी. अशी मागणी सर्व स्तरातून होवू लागली आहे.
गुहागरवासीयांना हवाय पेट्रोलपंप
याबाबत गुहागर न्युज कडे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आरोग्य विभागात काम करणारे, महापुरुष क्रिक्रेट संघाचे पदाधिकारी असलेले बाबु गुहागरकर म्हणाले की, शहरात हक्काचा पेट्रोलपंप झाला तर लोकांची गैरसोय दूर होईल. त्याचबरोबर आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थही इंधन भरण्यासाठी गुहागरमध्ये येतील . पर्यायाने शहरातील धंदे वाढून आर्थिक उलाढालीला चालना मिळेल. भाजपाचे गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे म्हणाले की, गुहागरात पेट्रोलपंप होणे ही काळाची गरज आहे. या विषयासाठी शहर भाजपतर्फे निवेदन देण्यास आम्ही तयार आहोत. शिवसेनेचे शहराध्यक्ष नीलेश मोरे यांनी देखील पेट्रोलपंपाचे समर्थन केले. आम्ही आमदार भास्कर जाधव यांना या विषयात लक्ष घालण्यास सांगू. पर्यटन व्यावसायिक अद्वैत जोशी म्हणाले की, स्थानिकांबरोबर पर्यटकांनाही पेट्रोलपंपाचा फायदा होईल. असगोलीतून गुहागरमध्ये नोकरीसाठी येणारे संतोष घुमे म्हणाले की, आम्हाला आठवड्यातून एकदा केवळ पेट्रोल भरण्यासाठी शृंगारतळीत जाणे परवडत नाही. त्यामुळे गुहागरात पेट्रोलपंप झाल्यास आमचे पैसे वाचतील.