यशवंत बाईत, शिफारस हाच आदेश समजून विहीर बुजवली
गुहागर, ता. 16 : पेठ अंजनवेलमधील ग्रामस्थांसाठी प्रस्तावित पाणी योजनेतील विहीर केवळ कनिष्ठ भुजल वैज्ञानिकांच्या शिफारशीवरुन का बुजविण्यात आली. असा प्रश्र्न अंजनवेलचे माजी सरपंच यशवंत बाईत यांनी उपस्थित केला आहे. या योजनेत झालेल्या गैरप्रकारांमुळे ग्रामस्थांची फसवणुक झाली असून योजनेची सखोल चौकशी करावी. असे पत्र बाईत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. Fraud in Jal Jeevan scheme

याबाबत बाईत म्हणाले की, अंजनवेल ग्रामपंचायतीने पेठ अंजनवेलमधील ग्रामस्थांसाठी जल जीवन मिशन मधुन पाणी योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेसाठी भुजल सर्वेक्षण करुन योजनेची विहीर इकबाल अरकाटे व इतर यांच्या जागेत खोदायची असे निश्चित करण्यात आले होते. भुजल सर्वेक्षणाच्या दाखल्याच्या १ वर्षाच्या मुदतीत विहिरीचे खोदकाम केले नाही. त्यानंतर विहीरीची जागाच बदलली. विहीर इकबाल अरकाटे यांच्या जागेत तसेच त्यांच्या जमिनीजवळून जाणाऱ्या नदीपात्रात खोदण्यात आली. सदरची जागा सरपंच व उपसरपंच यांनी दाखविल्याची माहीती ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता यांनी दिली आहे. मात्र खोदाई करण्यापूर्वी विहीरीच्या जागेचे भुजल सर्वेक्षण केले नाही. अटीप्रमाणे विहिरीचे खोदकाम करण्यापुर्वी ट्रायल बोअरवेल मारलेली नाही. यामुळे नव्या विहीरीमध्ये अपेक्षित जलसाठाच मिळाला नाही. Fraud in Jal Jeevan scheme

ही गोष्ट लक्षात येताच कनिष्ठ भुवैज्ञानिक यांनी एन. जे. एस. इंजीनिअर्स इंडिया प्रा. लि. कंपनीच्या भुवैज्ञानिकांसोबत येवून विहीरीची पहाणी केली. त्यावेळी एन. जे. एस. इंजीनिअर्स इंडिया प्रा. लि. कंपनीच्या भुवैज्ञानिकांनी विहिरीच्या जवळपास सुमारे ६० मीटर खोल बोअरवेल मारण्याची शिफारस केली होती. तरीही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ भुवैज्ञानिक यांनी आवश्यकतेनुसार भुजल उपलब्ध नसल्याने खडक, माती भरून विहिर बंद करण्यात यावी. अशी शिफारस केली. यासर्व गोष्टींचा अभ्यास निर्णय होणे आवश्यक होते. मात्र शिफारस हाच आदेश मानुन ग्रामिण पाणी पुरवठयाचे उपअभियंता यांनी सदर विहीर बुजवून टाकण्यात आली असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. Fraud in Jal Jeevan scheme
वास्तविक अंजनवेलच्या ग्रामसभेत या योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला त्याचवेळी मी स्वत: या प्रस्तावातील अनेक त्रुटी दाखवून दिल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीसह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आज दिसत आहे. यातून ग्रामस्थांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे. असे अंजनवेलचे माजी सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले. Fraud in Jal Jeevan scheme
या संदर्भात बोलतना अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सोनल मोरे म्हणाल्या की, जलजीवन योजनेच्या कार्यवाहीमध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सहकार्य करण्यापलीकडे ग्रामपंचायतीची कोणतीही भूमिका नाही. अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे पुरेसा जलसाठा असलेली नवी जागा आम्ही दाखवली आहे. पावसाळ्यानंतर तेथील कामाला सुरवात होईल.
