गुहागर, ता. 19 : राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयांत मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या प्रमुख मागण्यांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या आंदोलनात राज्यभरातील हजारो संगणक परिचालक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समीर ओक यांनी दिली. Computer operators’ protest
राज्यातील सुमारे २८ हजार ५०० ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सुमारे २० हजार संगणक परिचालक ‘संग्राम’ (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्गत विविध कंपन्यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी नागरिकांना विविध ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे परिचालक करीत असतानाही त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. Computer operators’ protest

यावर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून वारंवार लेखी व तोंडी आश्वासने देण्यात आली; मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोपही संघटनेने केला आहे. सध्या संगणक परिचालकांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याचे सांगण्यात आले. कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यास विलंब होत असल्यास किमान ७ हजार रुपयांची वाढ करून मासिक मानधन १७ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. Computer operators’ protest
याशिवाय ऑनलाईन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन संगणक, प्रिंटर व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच सर्व संगणक परिचालकांना किमान ५० लाख रुपयांचा अपघाती व आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे, या मागण्याही करण्यात आल्या आहेत. दि. २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एकत्र येत विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे समीर ओक यांनी सांगितले. Computer operators’ protest
