श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम
गुहागर, 19 : काका आमचा वडापाव घ्या. आम्ही खोबऱ्याची बर्फी आणली आहे. तीची चव घ्या. मावशी आमच्या पाणीपुरीची चव सांगा. असा संवाद बालदिनी श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयात ऐकायला मिळत होता. कुतुहलापोटी शाळेत शिरलो तर शाळेच्या व्हरांड्यात खाऊगल्ली पहायला मिळाली. गंमत म्हणजे या खाऊगल्लीतील प्रत्येक खाद्यपदार्थ शाळेतील मुले विकत होते. children’s day

14 नोव्हेंबरला बालदिनाच्या निमित्ताने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे नियोजन करताना शिक्षकांनी इयत्ता चौथीमधील 5 ते 6 मुलांचा 1 गट या प्रमाणे 10 गट केले. मुलांच्या पालकांना उपक्रमाची माहिती दिली. 10 गटांच्या छोट्याश्या दुकानातही वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीला असतील याची काळजी घेतली. पालकांनीही सहकार्य केले. त्यामुळे प्रत्यक्ष बालदिनी प्राथमिक विद्यालयाच्या व्हरांड्यातील खाऊगल्लीत सुकी भेळ, ओली भेळ, पाणीपुरी, दाबेली, वडा चटणी, इडली चटणी, भजी, खोबऱ्याची बर्फी, गाजराचा हलवा, लिंबू सरबत, कोकम सरबत या पदार्थांचे स्टॉल पहायला मिळाले होते. सुखी भेळ, ओली भेळ, पाणीपुरी, लिंबु सरबत, कोकम सरबत यांचे साहित्य मुलांनी आणले होते. त्या साहित्यातून खाद्यपदार्थ बनवून देणे. आपल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ विकले जावेत म्हणून मार्केटींग करणे. पैशांची देवघेव करणे, आदी कामे मुलेच करत होती. children’s day

मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी श्री. महेश जनार्दन भोसले बालविद्यामंदिर आणि श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे 250 ते 300 पालक आले होते. गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या संचालिक सौ. विद्या परचुरे या देखील मुलांचे कौतुक करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खाऊगल्लीत आल्या होत्या. त्यांनी प्रत्येक दुकानाला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.दुपारी 11 ते 1 या दोन तासांत 10 स्टॉलवरील विविध खाद्यपदार्थ विकत घेवून पालकांनीही बालदिनाचा आनंद लुटला. children’s day

children’s day : उत्साहवर्धक प्रतिक्रिया
शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान यावे. मुलांना व्यवसायाविषयी आकर्षण वाटवे. या उद्देशाने आम्ही हा उपक्रम घेतला. प्रत्येक स्टॉलवरील विक्रीतून 10 गटांना फायदा झाला. व्यवसायात मिळवलेला फायदा त्या विद्यार्थ्यांनाच समप्रमाणात वाटला. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्र्वास निर्माण झाला.
– समीर गुरव, मुख्याध्यापक, श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय

आईने घरात बनविलेल्या पदार्थाला मुले चटकन नाव ठेवतात पण खाऊगल्लीत मुले स्वत:हुन तयार केलेले पदार्थ विकतात तेव्हा त्यांना हे पदार्थ बनविण्यासाठी काय कष्ट आई करते ते समजते. नकळत अन्नाला नाव ठेवायचे नाही हा संस्कार त्यांच्यावर या उपक्रमातून झाला.
– संजय गमरे, शिक्षक, श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय
खाऊगल्लीत आम्ही खुप मज्जा केली. पहिल्यांदाच आम्ही दुकानदार झालो होतो. भरपूर पैसे हाताळायला मिळाले.
– कु. प्रिया तोडणकर
मुलांना आनंद देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम ही शाळा कायमच घेत असते. त्यातसुध्दा बालदिनाच्या निमित्ताने अभिनव उपक्रम शाळेने घेतला याचा खूप आनंद झाला.
– सौ. नेहा दिक्षित.

नेहमीपेक्षा वेगळा उपक्रम शाळेने घेतला त्याचा आनंद मुले मनापासून लुटत होती. न सांगता संस्कार कसे करायचे याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
– सौ. नयना हळदणकर, शिक्षिका माध्यमिक विद्यामंदिर गुहागर
