रत्नागिरी, ता.15 : दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारी नंतर यावर्षी नेहमीच्या वेळेपत्रकाप्रमाणे जून महिन्यात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिली दिवस हा विद्यार्थ्यांसाठी कौतुकाचा आनंदाचा क्षण असतो. त्याचप्रमाणे शिक्षकही उत्साही असतात. याच आनंदाचा उत्सव आज विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. Student Admission Ceremony

अभ्यंकर विद्यालयात प्रवेशोत्सव
रत्नागिरी येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात ढोल-ताशांचा गजर आणि नवागतांना गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात आले. यानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारावर फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. Student Admission Ceremony

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे यांच्यासह मुख्याध्यापक विनोद नारकर आणि सहशिक्षक, पालक संघ प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शाळेशेजारील अध्यात्म मंदिरात नेण्यात आली. दोन वर्षांनंतर पुन्हा शैक्षणिक वर्षाची सुरवात जूनमध्ये नियमितपणे झाली आहे. त्यामुळे आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. Student Admission Ceremony

पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तकांचे वितरण करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी खबरदारी म्हणून तोंडाला मास्क लावले होते. अनेक दिवसांनंतर मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे शाळेत सकाळपासून किलबिलाट सुरू झाला. शाळेचे नियमित कामकाज सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत मुलांचे शैक्षणिक आकलन व झालेले नुकसान भरून काढण्यासाठीही शाळेने पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत. शाळा प्रवेशोत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षक, पालक प्रतिनिधी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. Student Admission Ceremony

बालकमंदिरात विद्यार्थ्यांचे औक्षण
रत्नागिरी, ता.15 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरामध्ये बच्चेकंपनीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. या वेळी प्रवेशद्वार फुगे, कार्टून्सची चित्रे लावून सजवण्यात आले होते. सनई चौघड्याच्या रेकॉर्डवर मुलांचा शाळेत मंगलमय प्रवेश झाला. या वेळी शिक्षिका, सेविकांनी प्रवेश करणाऱ्या मुलांवर फुलांचा वर्षाव केला. Student Admission Ceremony

प्रथमच बालवाडीत येत असल्याने काही मुले आपल्या आई-वडिलांना सोडण्यास तयार नव्हती. काही जण रडत होती. परंतु अनेक मुले आनंदाने व उत्साहाने वर्गात बसली. त्यांनी उड्या मारल्या, टाळ्या वाजवल्या. बाईंनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थनासुद्धा सुरेख म्हटली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने आई-वडिल आणि काहींचे आजी-आजोबासुद्धा मुलांना शाळेत सोडायला आले होते. Student Admission Ceremony

आगाशे विद्यांमदिरात पुस्तकांचे वितरण
रत्नागिरी, ता.15 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत केले. पुस्तकांचे वितरणही करण्यात आले. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची क्रीडांगणावरून ढोल-ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी फुलांची उधळण करण्यात आली. दोन वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्यामुळे आणि मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. Student Admission Ceremony

या कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, शाळा प्रबंधकविनायक हातखंबकर, कार्यकारिणी सदस्य अनंत आगाशे, चंद्रकांत घवाळी, श्रीकृष्ण घवाळी, चंद्रशेखर करंदीकर, धनेश रायकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम आणि सहशिक्षक, पालक प्रतिनिधी उपस्थित होते. पहिलीच्या वर्गांच्या शिक्षिका सौ. भारती खेडेकर, सौ. ईशा रायंगणकर आणि सोमनाथ दुकले यांनाही गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी शिक्षक सुधीर शिंदे यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांना गाणे शिकवले. या वेळी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी विद्यार्थ्यांना सूचना सांगितल्या. शाळेच्या परंपरेविषयी माहिती दिली. संस्थेच्या गुरुकुलमधील मुलांनी उत्तम ढोल-ताशे वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. Student Admission Ceremony

