शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. 06 : आगामी खरीप हंगाम 2026 मध्ये मान्सूनची सुरुवात आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हाभर विविध खरीप मोहिमा राबविण्यात येत आहेत. ग्रामस्तरावर एकाच वेळी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले असून, त्यामध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, एसआरआय पद्धतीने भात लागवड, गोकृपा अमृत निर्मिती, अल निनो अनुषंगिक उपाययोजना तसेच फळबाग संवर्धन मोहिमांचा समावेश आहे. Agriculture Department Campaigns
कृषी विभागाच्या माहितीनुसार, माती परीक्षण मोहिमेमुळे जमिनीतील पोषक घटकांची माहिती मिळून संतुलित खत व्यवस्थापन शक्य होणार आहे. यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टळून उत्पादन खर्चात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. बीज प्रक्रिया मोहिमेअंतर्गत बियाण्यांवर जैविक व रासायनिक प्रक्रिया करून सुरुवातीच्या काळातील रोग व किडींपासून संरक्षण केले जाणार आहे. त्यामुळे रोपे सशक्त बनून महागड्या कीटकनाशकांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. Agriculture Department Campaigns
घरगुती पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाण्यांची गुणवत्ता तपासण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. किमान 70 ते 75 टक्के उगवण क्षमता असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भात उत्पादकांसाठी एसआरआय (सघन भात लागवड) पद्धतीचा प्रचार करण्यात येत असून कमी बियाणे, कमी पाणी आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यावर भर दिला जाणार आहे. या पद्धतीमुळे भाताच्या उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. Agriculture Department Campaigns

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गोकृपा अमृत निर्मिती मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढविणे, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे आणि उत्पादन खर्चात बचत करणे हा उद्देश आहे. अवघ्या 250 रुपयांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर गोकृपा अमृत तयार करता येत असल्याचे विभागाने सांगितले.
अल निनोच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पाणी साठवण, जल पुनर्भरण, उताराला आडवी मशागत, प्लास्टिक मल्चिंग, ठिबक सिंचन, शेततळी, जलकुंड, गॅबियन बंधारे तसेच दुष्काळ सहनशील वाणांचा वापर याबाबत जनजागृती केली जात आहे. Agriculture Department Campaigns
याशिवाय फळबागा वाचविण्यासाठी हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, ठिबक सिंचन, मल्चिंग, जैविक आच्छादन, शेततळी आणि जलकुंडांद्वारे पाणी साठवण यांसारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीत फळबागांचे संरक्षण आणि उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन खर्च कमी करावा आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. Agriculture Department Campaigns
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. Agriculture Department Campaigns
