रत्नागिरीच्या दोन शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग
गुहागर, ता. 25 : कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ च्या सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहचत ‘एव्हरेस्ट बेस कँप’ मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया यांचा यात समावेश आहे. वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणाऱ्या ‘अन्नपूर्णा’ पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. Karvir Hikers Reach Everest Base Camp

‘एव्हरेस्ट बेस कँप’साठी भगवान गौतम बुध्दांच्या जन्मभूमीत नेपाळ-काठमांडूत १५ मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपळूण येथील बी के वालावलकर रुरल मेडीकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉ सुप्रिया सातपुते, मुरुम (धाराशिव) चे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती पत्नी नुपूर आणि अक्षय मठकर दाखल झाले. Karvir Hikers Reach Everest Base Camp
काठमांडू जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमानतळ येथून छोट्या विमानप्रवासानंतर प्रत्यक्षात ‘इबीसी’ कडे वाटचालीला सुरुवात झाली. लुकला ते फाकडींग ते नामचे बाजार ते तेंगबोचे ते दिंगबोचे ते लोबुचे ते गोरकक्षेप ते एव्हरेस्ट बेस कँप असा हा ‘ट्रेक पूर्ण झाला. शनिवार दि २३ मे रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करुन या यशस्वी मोहिमेची सांगता झाली. Karvir Hikers Reach Everest Base Camp

रात्री उणे १५ अंश सेल्सिअस तर दिवसा ४ ते ६ अंश सेल्सिअस तपमान, लोबूचे ते ‘इबीसी’ अतिशय जीवघेणा प्रवास ठरला. प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते. वाटेत येणाऱ्या अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जावू शकते, हे या ट्रेकवरुन या पथकाने अनुभवले. नेपाळमधील ‘पीक १५ अॕडव्हेंचर’ चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली. Karvir Hikers Reach Everest Base Camp
