शासन आणि ग्रामस्थांच्या मेहनतीने वाढत आहे संवर्धन मोहिम
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 24 : 20 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास या छोट्याश्या गावाची ओळख कासवांचा गांव म्हणून जगभर झाली आहे. मात्र गेल्या 5 वर्षात वन खाते, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक जनतेच्या माध्यमातून कासव संवर्धन मोहिम जिल्ह्यात रुजत आहे. 5 वर्षांपूर्वी जिल्ह्यातील 5 ते 6 सागर किनाऱ्यांवर राबविले जाणारे कासव संवर्धन आज 33 किनाऱ्यांवर सुरू झाले आहे. यावर्षी प्रथमच गुहागरमध्ये सुरू झालेला कासव महोत्सव यशस्वी होत आहे. Ratnagiri is the turtle district
रत्नागिरी जिल्ह्यातील कासव संवर्धन मोहिमेचा इतिहास लिहिताना चिपळूण मधील सह्याद्री निसर्गमित्रचा उल्लेख विसरता येणार नाही. या संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांनी खासगी कंपनीतील नोकरी सांभाळत 100 कि.मि.चा प्रवास करुन वेळासमध्ये कासव मोहिमेला सुरवात केली. त्याकाळात भाऊंबरोबर कोणतीही शासकीय संस्था नव्हती. संवर्धनासंदर्भात आज उपलब्ध आहे इतकी माहिती देखील नव्हती. तरीही गावकऱ्यांमध्ये जागृती करत भाऊंनी वेळासमध्ये ऑलिव्ह रिडले कासव महोत्सवाचा श्रीगणेशा केला. त्याचाच परिणाम म्हणून मंडणगडमध्ये समुद्रकिनारी वसलेल्या वेळाससारख्या छोट्याश्या गावाची ओळख जगभरात कासवांचा गाव म्हणून झाली. Ratnagiri is the turtle district

पुढे भाऊ काटदरे यांच्या मदतीला वन विभाग आला. वेळास सोबत आंजर्ले, कोळथरे, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन अशा समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धन उपक्रमाला सुरुवात झाली. ही मोहिम यशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यावर भाऊ काटदरे आणि सह्याद्री निर्सगमित्रने आपल्या अन्य मोहिमांवर लक्ष केंद्रीत केले. वन विभागाबरोबर शासनाच्याच कांदळवन प्रतिष्ठानकडे हे काम सोपविण्यात आले. संवर्धनाला संशोधनाची जोड मिळाली. त्यातून अंडी संकलन आणि उबवणी केंद्रातील कार्यवाहीबाबतची कार्यप्रणाली विकसीत होऊ लागली. तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. माध्यमांमधुन येणाऱ्या माहितीमुळे सागर किनाऱ्यांवरील ग्रामस्थ कुतहलाने कासवांची घरटी शोधु लागले. त्याची माहिती शासनाला सांगू लागले. याच माहितीचा आधार घेत वन विभाग आणि कांदळवन कक्षाने ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिमेच्या कक्षा रुंदावल्या.
आज रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, आंजर्ले, आडे, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे, दाभोळ, गुहागर, वेळणेश्र्वर, रोहिले, वरवडे, रीळ, मालगुंड, गणपतीपुळे, भंडारपुळे, नेवरे, ढोकमळे, वारे, काळबादेवी, भाटे, गणेशगुळे, गावखडी, वेत्ये, आंबोळगड, माडबन, जैतापूर, अणसुरे, पूर्णगड, सालदुरे, पाळंदे, आणि कचरे या 33 गावांमध्ये कासव संवर्धन मोहिम सुरू झाली आहे. आजपर्यंत एकूण 962 घरट्यांमधुन 98 हजार 943 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. तसेच 48 हजार 834 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या 32 गावांमधील 20 गावांमध्ये कासवांच्या अंड्यांची संख्या 1 हजारहून अधिक आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यालाच कासवांचा जिल्हा अशी ओळख मिळणार आहे. आंबा, नारळ, काजू पाठपोठ ही नवी ओळख रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनला निश्चितच अधिक मजबूत करेल. Ratnagiri is the turtle district
जन्मदरात वाढ
5 वर्षांपूर्वीचा विचार केला तर संवर्धित अंड्यांमधुन कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण (जन्मदर) हा 35 ते 45 टक्के इतकाच होता. मात्र संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे यावर्षी आजपर्यंतचा जन्मदर 49.35 इतका वाढला आहे. अजुनही 50 हजार 109 कासवांची अंडी उबवणी केंद्रात आहेत. त्यामुळे हा जन्मदर आणखी वाढणार आहे. Ratnagiri is the turtle district
