सौ. मनाली बावधनकर, भावार्थमध्ये रंगला शब्दप्रवास
Guhagar –
सध्याच्या आणि मागच्या काळातील स्त्रियांच्या स्थितीमध्ये विशेष बदल झाला नसून स्त्रियांच्या समस्या आजही कायम आहेत. बाईपणाच्या उंबरठ्यावर या कथासंग्रहातील ग्रामीण, निमशहरी, शहरी भागातील नायिकांद्वारे या उलगडण्याचा प्रयत्न केलाय. असे मत प्रा. सौ. मनाली बावधनकर यांनी व्यक्त केले.

चिपळूणमध्ये TWJ – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये प्रा. सौ. मनाली बावधनकर यांच्या समवेत ‘प्रवास शब्दांचा, आपल्या माणसांचा’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. Manali Interview at chiplun
स्थानिक लेखक-कवींना व्यासपीठ मिळावे, त्यांचे लिखाण समाजापर्यंत पोहोचावे यासाठी भावार्थतर्फे शब्दप्रवास या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शब्दप्रवास कार्यक्रमात ज्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे त्या स्थानिक लेखकांची मुलाखत आयोजित केली जाते. त्यातून त्यांचा लेखनप्रवास, जीवनप्रवास उलगडला जातो. पहिला शब्दप्रवास चिपळूणमधील युवाकवी श्री. चिन्मय कार्ले यांच्या समवेत संपन्न झाला तर दूसरा शब्दप्रवास रविवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सायं. ६:०० ते ७:०० या वेळेत संपन्न झाला.
Manali Interview at chiplun
प्रा. सौ. मनाली बावधनकर यांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या ‘बाईपणाच्या उंबरठ्यावर’ या पुस्तकाच्या निमित्ताने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. भावार्थमधील प्रेरणा करंदीकर हिने ही मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मॅडमचा बालपणापासूनचा जीवनप्रवास उलगडला. ‘बाईपणाच्या उंबरठ्यावर’ या पुस्तकातून त्यांनी स्त्रीच्या विविध रुपांची, त्यांच्या समोरील आव्हानांची उकल केली आहे. सरोगसी, स्त्री- स्वातंत्र्य, करियरबद्दल महत्वाकांक्षा, महाविद्यालयीन जीवन अशा विविध विषयांवर आधारित कथा या पुस्तकात आहेत. मुलाखतीदरम्यान या कथा लिहिण्यामागील पार्श्वभूमी त्यांनी सांगितली. सध्याच्या आणि मागच्या काळातील स्त्रियांच्या स्थितीमध्ये विशेष बदल झाला नसून स्त्रियांच्या समस्या आजही कायम आहेत असे मतही त्यांनी मांडले. स्त्रियांच्या प्रश्नांवर बोलताना ग्रामीण भागातील स्त्रियांना ई – मोबईलचे प्रशिक्षण दिल्यानंतरचा अनुभवही त्यांनी सांगितला. पालक – मुले यांनी एकमेकांशी कसे वागावे, तरुणांनी करियर, प्रेम आणि कुटुंब यांचा कसा समतोल राखावा याबद्दलही खूप सुंदर मार्गदर्शन केले. आयुष्यात पुढे जाताना प्रसंगी दोन पाऊलं मागे जावे आणि ध्येय साध्य करावे असा मोलाचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. शिक्षिका म्हणून काम करताना मिळणारे समाधान व्यक्त करताना त्यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गृहिणी, शिक्षिका आणि लेखिका या तीनही आघाड्या सांभाळून सगळ्याचा समतोल राखणे कसे जमते यावर बोलताना त्यांनी महिलांकडे ते कसब तर असतेच असे सांगून आपल्याला या सर्व प्रवासात एकत्र कुटुंबाची खूप साथ मिळाली अशी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या सर्व प्रवासात त्यांच्या पतीचा खूप मोठा वाटा आहे असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. आवडत्या लेखनप्रकारांबद्दल बोलताना त्यांनी कविता, कथा, कादंबरी यांबरोबरच नाट्य-लेखनही खूप आवडते असे सांगत महाविद्यालायसाठी लिहिलेल्या नाटकांबद्दल त्या भरभरून बोलल्या. पुढील लेखन प्रवासविषयी बोलताना त्यांनी पुरुषांच्या समस्यांवर आधारित कथांचा संग्रह प्रकाशित होणार आहे असे नमूद केले.
या कार्यक्रमाला साहित्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावार्थचे व्यवस्थापक श्री. विवेक कदम आणि द सोशल रिफॉर्म्सच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली. Manali Interview at chiplun
