महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी
(जिल्हा माहिती संपर्क कार्यालयाद्वारे प्रसारित बातमी)
मुंबई : सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ईंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात ईंटर्नना सोशल मिडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, अॅडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था, इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविता येईल.
महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. ईंटर्नना दहा हजार रूपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. ईंटर्नना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे. सोशल मिडीयाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. ईंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल, मात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवादपणे करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल. २५ वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या ईंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतीम मुदत १६ सप्टेंबर, २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
तरुणांच्या संकल्पनांना चालना देणार – मंत्री श्री. आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहीमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल.