सचिन बाईत : बिनविरोधचे वाढते प्रमाण आनंद देणारे
गुहागर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे वाढते प्रमाण निश्चितच आनंद देणारे आहे. त्याचबरोबर सध्या सरपंच पदावर असलेल्या आणि भविष्यात सरपंच होणाऱ्या महिलांना स्वतंत्रपणे भयमुक्त वातावरणात कारभार करण्यासाठी आवश्यक वातावरण ग्रामस्थांनी तयार करावे. असे प्रतिपादन शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केले.
तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, गुहागर तालुक्यातील 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याचे संपूर्ण श्रेय तेथील ग्रामस्थांना जाते. गावाच्या विकासासाठी सुरवातीपासून सर्व ग्रामस्थांनी एकत्र प्रयत्न केल्याने हे चित्र दिसत आहे. त्याचा परिणाम ग्रामपंचायतीचा कारभार करताना दिसून येईल. गावपातळीवर निवडणुका झाल्या तर ग्रामपंचायतीच्या बैठकीपासून ग्रामसभेपर्यंत कोणत्याही कामांमध्ये वैयक्तिक वादांचे, अंतर्गत कलहाचे प्रतिबिंब दिसते. सर्वांनी एकत्रीत येवून पंचायत सदस्य निवडून दिल्याने हा मुद्दाच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित होणार नाही. याच पद्धतीने महिला सरपंच असलेल्या किंवा होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी समजुतदारपणाची भूमिका घेणे आवश्यक असते. एक महिला जेव्हा सरपंच होते तेव्हा तिला घर सांभाळून, मुलांचे करुन, गावासाठी वेळ द्यावा लागतो. बहुतेक वेळा अशा महिला सरपंचाला गावातील अंतर्गत प्रवाहांची इंत्यभूत माहिती नसते. ती महिला सरपंच गावाच्या विकासाचा निस्वार्थ दृष्टीकोन समोर ठेवून, ग्रामविकास अधिकारी, अन्य ग्रामपंचायत सदस्य यांचा सल्ला घेवून निर्णय घेते. मात्र ग्रामसभांमध्ये काही मंडळी अशा महिला सरपंचाला भंडावून सोडतात, जेरीस आणतात, अपमानित करतात. त्यामुळे राजकारणात येण्यासाठी महिला इच्छुक नसतात. आज देखील अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार देताना ग्रामस्थांची, सर्व राजकीय पक्षांची धावपळ उडाली. पालशेत सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमधील महिला सरपंचाने आरोपांना कंटाळून राजीनामा दिला. गुहागरसारख्या तालुक्यामध्ये अशी वेळ महिला सरपंचावर येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे महिला सरपंच असलेल्या गावांनी तसेच जीथे उद्या महिला सरपंच आरक्षण पडेल तेथील ग्रामस्थांनी महिलेना सन्मानाची वागणूक देत, वैयक्तिक वादांमध्ये त्यांना लक्ष्य न करता स्वतंत्रपणे कारभार करु द्यावा. असे आवाहन बाईत यांनी केले आहे.