गुहागर, ता. 22 : चिपळूणला पागेवर रहाणाऱ्या आशा कृष्णाजी चितळे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी वार्धक्य आणि अल्पशा आजारामुळे शुक्रवारी 21 एप्रिलला रात्री 3 वा. निधन झाले. त्या पनवेलला मुलाकडे रहात होत्या. त्यांचे पार्थिव चिपळूणला आणून रामतिर्थांवर दुपारी 4.00 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. समर्थभक्त आशाताई गेली अनेक वर्ष शिवथरघळीत नैमित्तिक कार्यक्रमांमध्ये स्वयंपाक सेवा करत असतं. Annapurna Aashatai Chitale
आशाताईंचे माहेर चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे येथील आचार्य या भिक्षुक घराण्यात. त्या काळातील पद्धतीप्रमाणे लग्न लवकर झाले. कृष्णाजी चितळे भारतीय सैन्यात होते. यजमानांच्या निधनानंतर पदरात असलेल्या मुलगा व मुलीच्या संगोपनासाठी, संसाराचा गाडा हाकण्यासाठी आशाताईंनी झारा उलथा हातात घेतला. चिपळूण परिसरात कोणाच्याही घरी लग्न, मुंज, वाढदिवस अन्य धार्मिक कार्यक्रम असला की स्वयंपाक करायला आशाताई असतं. याशिवाय दिवाळीला फराळाचे सर्व पदार्थ त्या करायच्या. मुले मोठी झाली. सदानंद चितळेंना कोकण रेल्वेत नोकरी मिळाली. मुलीचे लग्न झाले. त्यानंतर या व्यवसायाला आशताईंनी सेवेचे रुप दिले. मठ मंदिरांमध्ये महाप्रसाद करायला आशाताईंना बोलावल्यावर आपल्या घरातील काहीना काही भिक्षा घेऊनच त्या मठ मंदिरात जात. Annapurna Aashatai Chitale


रायगड जिल्ह्यातील दासबोधाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवथरघळीतही स्वयंपाक करण्यासाठी आशाताई जाऊ लागल्या. त्यानंतर आशाताई आणि शिवथरघळ हे गणित जमुन गेले. प्रापंचिकांचा अभ्यासवर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिबिर, लहान मुलांचे शिबिर, दासनवमीचा नऊ दिवस उत्सव आदी वार्षिक उत्सव, कार्यक्रम असले की, दोन दिवस आधी आशाताई शिवथरघळीच्या स्वयंपाकघराचा ताबा घ्यायच्या. आशाताईंचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु व्हायचा. व्यवस्थेत असलेले सेवेकरी, येणारी भक्तमंडळी, शिबिरार्थी कायमच स्वयंपाकावर खुष असतं. मानधनाची अपेक्षा न करता त्यांनी अनेक गरजू लोकांकडे, मंदिरांमध्ये स्वयंपाक केला. म्हणूनच आशाताईंना सर्वजण आदराने अन्नपूर्णा म्हणतं. Annapurna Aashatai Chitale


त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुखात सदैव रामनाम. 1-2 कोटी जपाचा संकल्प करावा आणि तो पुरा झाला की पुन्हा संकल्प करावा. असे कायम चालू होते. रोज निरनिराळ्या ग्रंथांचे पारायण त्या करीत. परंतु आजपर्यंत आपण किती जप केला याचा नामोच्चार या अन्नपूर्णेने कधी केला नाही. स्वयंपाकसेवा किती ठिकाणी केली ते सांगितले नाही. अन्नपूर्णेची तीन दशकाहून अधिक काळ सेवा करणाऱ्या आशाताई आज 22 एप्रिलला अनंतात विलिन झाल्या. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Annapurna Aashatai Chitale