मुंबई : देशामध्ये ज्या पद्धतीने डिजिटल व्यवहार वाढले आहेत त्याच प्रमाणात ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याच्या प्रकरणांमध्येही वाढ झालीय. कोरोना कालावधीमध्ये तर ऑनलाइन माध्यमातून व्यवहार वाढल्याने आर्थिक फसवणुकीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. अशापद्धतीने ऑनलाइन फसवणूक झाल्यास नक्की काय करावं हे अनेकांना कळत नाही. अनेकदा छोटी रक्कम असल्यावर जाऊ दे म्हणून विषय सोडून देण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर घाबरुन न जाता योग्य पद्धतीने तक्रार केल्यास सर्व पैसे परत मिळू शकतात.
एखाद्या छोट्या चुकीमुळे किंवा अन्य ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या माध्यमातून गंडा घालण्यात आला असेल तर फसवणूक झालेली व्यक्ती रिफंडसाठी प्रयत्न करु शकते. मात्र हा रिफंड मिळवण्यासाठी तात्काळ तक्रार करणं आवश्यक आहे. अनेकदा असं दिसून येतं की ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाल्यानंतर नक्की काय करावे, कुठे तक्रार करावी, अर्ज कसा करावा या गोष्टी समजत नाहीत. मात्र घाबरुन न जाता पैसे परत मिळवण्यासाठी काय मार्ग उपलब्ध आहेत, कोणते कायदेशीर पर्याय फसवणूक झालेल्यांना वापरता येतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
आरबीआय
आरबीआयचा नियम काय सांगतो?
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सॅक्शन म्हणजेच ऑनलाइन व्यवहाराअंतर्गत फसवणूक झाली असेल तर यासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीला जबाबदार धरलं जात नाही. जर या फसवणुकीसंदर्भात तातडीने आपल्या बँकेला माहिती दिली तर कायदेशीर पावलं उचलताना फायद्याचं ठरतं.
तक्रार कुठे करावी?
जर तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीचा फटका बसला असेल आणि तुमच्या खात्यामधून पैसे दुसऱ्या खात्यावर पाठवण्यात आले असतील तर फसवणूक झाल्यापासून तीन दिवसांच्या आत तक्रार करणं आवश्यक असतं. तसेच फसवणूक झाल्यानंतर https://www.cybercrime.gov.in/ किंवा स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करता येते. या वेबसाईटवर तक्रार नोंदवल्यावर तक्रारदाराला एसएमएसच्या माध्यमातून माहिती दिली जाते. तसेच एक रेफ्रन्स क्रमांकही तक्रार दाखल केल्यानंतर दिला जातो. ज्या माध्यमातून तक्रारदाराला तपासासंदर्भातील माहिती घेता येते.
१० दिवसात मिळू शकतो रिफंड
जर बँकेला माहिती देऊन योग्य पद्धतीने तक्रार केल्यास फसवणूक झालेल्या व्यक्तीचं मोठं नुकसान होत नाही. नियमांनुसार त्या व्यक्तीला दहा दिवसांमध्ये रिफंड मिळू शकतो. ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यानंतर जाऊ दे म्हणून विषय सोडून देण्याची किंवा काय करावं यासंदर्भात गोंळून जाण्याची गरज नाहीय. फसवणूक झाल्यानंतर बँकेमध्ये फोन करुन ऑनलाइन व्यवहार तात्पुरते स्थगित करण्याबरोबरच प्रत्यक्ष बँकेत जाऊन लेखी तक्रार देणंही फायद्याचं ठरु शकतं. त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांअंतर्गत जवळच्या पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवणेही फायद्याचे असते.
फोन कॉलवरुन तक्रार कशी नोंदवाल?
सायबर फसवणुकीसंदर्भात आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून वापरकर्त्यांनी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 155260 संपर्क करावा. सध्या ही सेवा केवळ छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये या सात राज्यांमध्ये उपलब्ध असली तरी ती लवकरच इतर राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये सुरु करता येणार आहे.
ईमेलवरुन फसवणूक झाली असेल तर तक्रार करताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात
? लेखी तक्रार ज्यामध्ये नक्की काय घडलं याची सविस्तर माहिती असते.
? ज्या ई मेलच्या माध्यमातून फसवणूक झाली त्याची कॉपी.
? ज्यांना ई मेल आला त्यांच्या ई मेल आयडीवरुनच ही कॉपी देण्यात यावी.
? ई मेलचा विषय काय होता त्याची माहिती.
? या सर्व कॉपी पोलिसांकडे तक्रार नोंदवायला जाताना डिजीटल आणि प्रिंट काढून घेऊन जाव्यात.
? सॉफ्ट कॉपी या सीडीमधून पोलिसांकडे द्याव्या लागतात.
सोशल मीडियावरुन फसवणूक झाली असेल तर तक्रार करताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात
? ज्या मजकुराच्या माध्यमातून फसवणूक झाली तो मजकूर किंवा प्रोफाइलचे स्क्रीनशॉर्ट.
? संबंधित मजकुराची युआरएल स्क्रीनशॉर्ट स्वरुपात.
? या सर्व कॉपी पोलिसांकडे तक्रार नोंदवायला जाताना डिजीटल आणि प्रिंट काढून घेऊन जाव्यात.
? सॉफ्ट कॉपी या सीडीमधून पोलिसांकडे द्याव्या लागतात.
अॅपवरुन फसणूक झाली असेल तर तक्रार करताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात
? ज्या अॅपवरुन फसवणूक झाली त्याचे स्क्रीनशॉर्ट आणि ते कुठून डाऊनलोड केले याची माहिती.
?फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या बँकेचे स्टेटमेंट.
? सर्व डिजीटल पुरव्यांचे सॉफ्ट आणि हार्ड कॉपी तक्रार करता पोलिसांकडे दाखल करावी लागेल.
एका अहवालानुसार २००९ ते २०१९ दरम्यान १.१७ लाख ऑनलाइन बँकिंग फ्रॉड झाल्याची नोंद आहे. या माध्यमातून तब्बल ६१५ कोटी ३९ लाखांची रक्कम सायबर चोरट्यांनी लंपास केलीय.