1999 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे पराभुत झालेले अनेक उमेदवार आजही राजकारणात सक्रिय आहेत. अपवाद आहे तो दोन उमेदवारांचा. एक विजयराव भोसले. ज्यांनी 2014 निवडणूक शिवसेनेचा तिकीटावर लढवली होती. दुसरे आहेत सहदेव बेटकर. ज्यांनी 2019 ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती. हे उमेदवार सध्या काय करतात असे कुतुहल सध्या मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे.
[bsa_pro_ad_space id=3]
लोकसभा निवडणुकीतील मतदारसंघाचे क्षेत्र मोठे असते. त्या निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रभावापेक्षा पक्षाकडे पाहून, स्थानिक नेते, कार्यकर्त्याच्या प्रचारातून मतदान कोणाला करायचे हे मतदार निश्चित करतो. विधानसभा निवडणुकीतचे क्षेत्र छोटे असल्याने प्रमुख पक्ष उमेदवार देताना त्याच्या प्रभावाचा विचार करतात. साधारणपणे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा थेट मतदारांशी संपर्क असतो. स्वाभाविकपणे उमेदवाराला निवडून आलो नाही तरी तुमच्यासोबत राहीन हे सांगावेच लागते. पक्ष मोठा असल्याने त्यांना कार्यकर्त्यांच्या संपर्कात रहावेच लागते. असे उमेदवार आपल्या पक्षातही क्रियाशील असतात. त्याच्याबद्दल काही ना काही माहिती प्रसारमाध्यमांमधुन मिळत असते. या अपवाद आहे गुहागर विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांचा.
1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रकांत (आबा) बाईत पराभुत झाले. मात्र शिक्षण संस्था, सहकार क्षेत्र यामधुन आबा आजही कार्यरत आहेत. लोकांच्या संपर्कात आहेत. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पराभुत झालेले कै. नंदुशेठ पवार गुहागर आणि चिपळुणमध्ये सक्रीय होते. विधानसभा निवडणुकीनंतरही वारंवार ते गुहागरमध्ये येत असतं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांचा पराभव झाला. त्याची राजकीय कारणेही वेगळी आहेत. मात्र त्यानंतरही ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते. शिवसेना नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्थान आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. विनय नातू आणि शिवसेनेचे विजयराव भोसले यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतरही डॉ. विनय नातू सक्रीय होते. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा त्यांनी केला. तसेच मतदारसंघातील प्रश्र्नांनाही त्यांनी वाचा फोडली. परंतु राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे उमेदवार विजयराव भोसले ना गुहागरमध्ये आले. ना अन्यत्र सक्रीय असल्याचे कोणी पाहिले. 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाचे उमेदवार सहदेव बेटकर होते. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून ते सक्रीय होते. फक्त पक्ष वेगळा होता. पण पराभुत झाल्यानंतर सहदेव बेटकरही स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात नाहीत.
विजयराव भोसले संपर्कात नसले तरी येथील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख ही रचना कार्यरत होती. तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर गुहागर तालुक्यात लक्ष घालत होते. पण 2019 च्या निवडणुकीआधी आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडली. तेव्हा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा नेता हवा होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सहदेव बेटकरांचा येथील गावांशी, वाडयांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क होता. पराभूत झाल्यानंतरही ते येत राहीले असते तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाय रोवण्यास मजबुत संधी मिळाली असती. मात्र सहदेव बेटकर असोत किंवा विजयराव भोसले असतो दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीचा उत्सव संपल्यावर प्रचारात घेतलेल्या आणाभाका, दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी राजकीय पक्षांवर सोपवून आपले हात वर केले आहेत.