रुग्ण संख्या घटल्याने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील धार्मिकस्थळे बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आली आहेत. लेणींसह दौलताबादचा किल्ला आणि बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी या पर्यटनस्थळांना आता भेटी देता येणार आहेत.
शहरातील रुग्ण पॉझिटिव्ह दर आता केवळ ०.४५ टक्के एवढा असून ग्रामीण भागातील दर ४.५ टक्के एवढा आहे. तर प्राणवायू सुविधा असणाऱ्या केवळ १०.८० टक्के खाटांवर आता रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्ग कमी झाल्याने पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. पहिल्या लाटेत करोना संख्या कमी झाल्यानंतर काही दिवस पर्यटन स्थळे सुरू झाली होती. पण पुन्हा ती बंद करण्यात आली. आता ती गुरुवारपासून सुरू करण्सास मान्यता देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी परदेशी पाहुणे येतात. वर्ष-दीड वर्षाच्या जागतिक लॉकडाउनमुळे परदेशी पर्यटक येत नाहीत. त्यामुळे देशी पर्यटकांच्या जीवावर आणखी किती आर्थिक उलाढाल होईल. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच दौलताबादच्या किल्ला, असा प्रवास पर्यटक करीत असतात. शहरातील पर्यटनासही त्यामुळे चालना मिळत होती. आता दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जागतिक वारसा असणारी पर्यटनस्थळे सुरू करण्यास भारतीय पुरातत्व विभागाने १५ जून पर्यंत मज्जाव केला होता. मात्र, रुग्णसंख्येचा एकूण आढावा घेतल्यानंतर पर्यटन स्थळे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पर्यटनस्थळी सफाई, सुरक्षा आदीची काळजी घ्यावी, असे करताना करोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.