गुहागर : तालुक्यातील पवारसाखरी येथे कोणत्याही अटी शर्थीचे पालन न करता रात्री अपरात्री उत्खनन सुरु आहे. वस्तीपासून अवघ्या 100 मिटरवर सुरंग लावले जात असल्याने येथी 38 घरांना तडे गेले आहेत. तरीही शासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात पवारसाखरीतील ग्रामस्थ हरित लवादाकडे दाद मागणार आहेत.
At Pawar Sakhari Excavation has started overnight without fulfilling any conditions. As many as 38 houses have been blocked due to tunneling just 100 meters from the settlement. However, no measures are being taken by the government. Therefore, the villagers of Pawar Sakhari are going to appeal to the green arbitration against the concerned contractor and Gram Panchayat administration.


पवारसाखरीतील उत्खननाचे काम बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड कन्स्ट्रक्शन ही कंपनी करत आहे. या कंपनीने कपिल एक्स्प्लोझिव्ह या उपठेकेदाराला सुरुंग लावण्याचे काम दिले आहे. तर अन्य काम साहिल एंटरप्रायझेस या कंपनीकडे सोपविले आहे. साहिल एंटप्रायझेस कंपनीवर सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त असल्याने शासकीय यंत्रणा ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यात हरित लवादासमोर बाजु मांडण्यासाठी पवारसाखरीमधील 44 ग्रामस्थांनी एकत्र येत अनेक पुरावे गोळा केले आहेत. यामध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या सुरुंगाच्या आवाजांची मोजणी, रात्रीच्या वेळी सुरु असणाऱ्या कामाचे, वहातुकीचे व्हिडिओ, तसेच ग्रामपंचायतीकडे आजपर्यंत केलेल्या तक्रारी आदी गोष्टीचा समावेश आहे.
यावेळी विजय पालशेतकर म्हणाले की, आमच्या रहात्या घरापासून 60 मिटर अंतरावर सुरुंग लावले जातात. पहिल्यांदा सुरुंग लावले तेव्हा आमच्या वाडीतील 15 घरांना तडे गेले. त्याचा पंचनामा झाला. तहसीलदारांकडे तक्रारी केली. तेव्हापासून ग्रामपंचायतीपासून तहसीलदारांपर्यंत तक्रार करुनही सुरुंग लावणे थांबलेले नाही. कायद्याने लोकवस्तीपासून 200 मिटर पर्यंत उत्खनन करु नये हा नियम आहे. मात्र तो धाब्यावर बसवून काम सुरु आहे. अक्षय पवार म्हणाले की, वन विभागाच्या शेड्यूल 1 ते 4 यादीत असलेल्या प्राण्यांच्या अधिवासाला धक्का पोचला आहे. भुसुरुंग आणि उत्खननामुळे भुजल पातळी कमी झाली आहे. ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीला वेळापत्रक दिले जात नाही. रात्री सुरंग लावले जातात. वाहतूक केली जाते. हे बेकायदेशीर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उत्खननाला पर्यावरण विभागाची परवानगी नाही. असे सर्व नियम धाब्यावर बसवून उत्खननाचे काम सुरु आहे. ग्रामसभा न घेता, पदाचा गैरवापर करुन ग्रामपंचायतीने उत्खननाला परवानगी दिली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी दिल्या. तरीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पवारसाखरीतील 44 ग्रामस्थांनी अखेर हरित लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.