डॉ. विनय नातू : जिल्ह्यातील किती रुग्णवाहिका सुस्थितीत याची माहिती द्यावी
गुहागर : राज्यामध्ये रुग्णवाहिकेची सुविधा न मिळाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्येही रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध वेळवर उपलब्ध न झाल्याने काहींना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिकेची खरेदी करावी. तसेच प्रशासनाने जिल्ह्यात सध्या सुस्थितीत असलेल्या सर्व रुग्णवाहिकांची माहिती प्रसिध्द करावी. अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नातू यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
डॉ. नातूंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये किती रुग्णवाहिका आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या किती रुग्णवाहिका आहेत व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एकूण किती रुग्णवाहिका आहेत. 108 रुग्णवाहिकेची सेवा एकूण किती ठिकाणी सुरु आहे. खासगी रुग्णालयांच्या, खाजगी विविध संस्थांच्या रुग्णवाहिका किती आहेत. शासनाने दिलेल्या निधीमधुन खाजगी संस्थांनी खरेदी केलेल्या रुग्णवाहिका किती आहेत. यापैकी रुग्णवाहिका तालुक्यामध्ये, किती रुग्णवाहिका जिल्ह्यामध्ये प्रवास करू शकतात. याबाबत परिपूर्ण तपशील जाहीर करण्यात यावा. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत याचे प्रसिध्दीपत्रक काढण्यात यावे. रत्नागिरी जिल्ह्यामधील अनेक कोरोनाबाधित रूग्ण योग्य उपचाराकरता अन्य जिल्ह्यांमध्ये जात आहेत. याकरता अन्य जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या रुग्णवाहिकांची यादी प्रसिध्द करण्यात यावी. जिल्ह्यात किती कार्डियाक रुग्णवाहिका कोरोना रुग्णांकरिता उपलब्ध आहेत याची माहिती फोन नंबर व पत्त्यासह प्रसिध्द करावी.
जिल्ह्यामध्ये आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन विभागाकडून अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिकेची खरेदी करण्यात यावी. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयाजवळ व खाजगी रुग्णालयाजवळ तसेच शासनमान्य कोविड केअर सेंटर जवळ कोविड रुग्णांकरता उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिका व कोविड व्यतिरिक्त अन्य रुग्णांकरता उपलब्ध असणाऱ्या सुस्थितीतील रुग्णवाहिकांची माहिती त्वरीत जिल्हा माहिती अधिकारी व आरोग्य विभाग यांनी प्रसिध्द करावी. दर आठवड्याला या सर्व रुग्णवाहिका योग्य प्रकारे सुरु आहेत ना याची खात्री करून पुन्हा ही यादी प्रसिध्द करावी. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड व सर्वसाधारण आजारी रुग्णांकरिता योग्यवेळी रुग्णवाहिका मिळाल्याने त्यांचे जीव वाचण्यास मदत होईल. अशी मागणी डॉ. नातू यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे.