आमदार जाधव, मतदारसंघातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनाही केले आवाहन
गुहागर : कापलेल्या भाताबरोबरच उभ्या पिकातील दाणा देखील पोचा असु शकतो. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा योग्य पध्दतीने व्हावेत. यासाठी मतदारसंघातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी स्थानिक पातळीवर शेतकऱ्याला मदत करावी. असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.
आमदार जाधव म्हणाले की, प्रचंड प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग कधी नव्हे एकढया फार मोठया संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने उभी शेती, कापलेली शेती, कापून शेतामध्ये साठवून ठेवलेली (अडवी/उडवी) शेतीसुध्दा डोळ्यादेखत वाहून गेली आहे. याची तातडीने दखल घेवून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्हयामध्ये महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरूवात केलेली आहे. आपल्याकडे ज्यावेळी शेती गर्भामध्ये येते त्याचवेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे भात किंवा नाचणी यांच्या लोंबींवर किंवा कणसांवर दाणे दिसत असले तरी ते पोचे आहेत याचाही विचार पंचनामे करतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांना करण्यास मी सांगितले आहे. मी सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की, ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे. या कठिण व अस्मानी संकटात आपला बळीराजा पुरता उध्वस्त झाला आहे. त्याच्या पाठिशी आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण आपापल्या भागांत फिरून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे आणि अधिकचे पंचनामे करून घ्यावेत. जेणेकरून या संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना उध्दव ठाकरे सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता अधिक सोयीचे होईल. याविषयी मी सातत्याने अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बोलत आहेच, परंतु काही अडचणी असल्यास माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.