गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संलग्नित ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील गावोगावी जाऊन ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणनेबाबत ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी गाव,वाडी बैठकांवर जोर देण्यात येत असून आरक्षणाचा मुद्दा पटवून देण्यात येत आहे. ओबीसींचे आरक्षण व त्याचा बचाव करण्यासाठी होऊ घातलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील बलुतेदार,आलुतेदार,भटक्या विमुक्तांसहित गठीत झालेल्या समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर अंतर्गत पडवे, पालशेत, अंजनवेल, वेळणेश्वर या जिल्हा परिषद गटनिहाय उपसमित्या तसेच गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्र समिती,त्यानंतर गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
गुहागर तालुक्यात कुणबी,भंडारी, तेली, कुंभार, खारवी, कोष्टी, सुतार, सोनार, नाभिक, गुरव, लोहार, गवळी, माळी, वाणी व परीट अशा ओबीसी जाती असून देशात व राज्यात लोकसंख्येने सर्वाधिक ५२ % असलेल्या ओबीसींना केंद्रात २७% व महाराष्ट्रात १९% इतके तुटपुंजे आरक्षण दिले जात आहे.ओबीसीमध्ये भारतात ३७४३ तर राज्यात ३४६ जातींचा समावेश आहे मात्र तुलनेने त्यांना मिळणारे आरक्षण हे फार अन्यायकारक आहे.याबाबत तुलनात्मक माहिती, ओबीसींच्या मागण्या विविध समित्यांच्या माध्यमातून माहिती पत्रकाद्वारे तालुक्यातील गावो- गावी,वाडी-वस्तीवर पोहोचविण्यात येत आहेत. गाव बैठका घेऊन जातनिहाय जनगणना व आरक्षणाचा मुद्दा जनमानसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.मराठा जातीचे ओबीसी करण करण्यात येऊ नये, जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसींचा शासकीय सेवेतील अनुशेष भरावा व मेगा भरती करण्यात यावी,१००% शिष्यवृत्ती देण्यात यावी,आदिवासी जिल्ह्यात ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यात यावे,महाज्योती संस्थेसाठी १००० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी मिळावा,राज्यात १०० बिंदुनामावली लागू करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण मिळावे,शेतकरी, शेतमजूर, कारागिरांना ६०वर्षे वयानंतर पेन्शन योजना चालू करावी,ओबीसी बहुजन कल्याण विभागाची कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावीत या प्रमुख मागण्या तळागळातील ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. राज्यभर ओबीसी जनमोर्चाचे काम व्यापक होत असून गुहागर तालुक्याने ओबीसी जनजागृती मध्ये आघाडी घेतली आहे.ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा परिषद गटनिहाय उपसमित्या, सर्व कार्यकारणी सदस्य,गाव समित्या यांच्या माध्यमातून ओबीसी जनजागृती ने जोर धरल्याचे दिसून येत आहे.