रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 6 ते 9 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.


1. दिनांक 10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू असल्याने दिनांक 6 सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी.
2. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये.
3. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या ३-३ रांगा करू नये. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी.
4.वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
5. अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.
6. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असलल्यास घरातच सुरक्षित राहावे.
7. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये.
8. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
9.आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक क साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.
10. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तु विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे.
11. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.
12. आपले जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात.
13. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत.
14. अतिवृष्टीच्या बाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा.
15. रेडिओ साठी काही जास्त वॅटच्या बॅटरीज जवळ ठेवाव्यात.
16. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
17. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी.
18. मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.
19. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये.
20. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.
मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२ व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी ०२३५२-२२६२४८ / २२२२३३ या क्रमांकावर तसेच तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधावा.

