वडद डाफलेवाडी येथील घटना
गुहागर : तालुक्यातील वडद डाफलेवाडी येथील शेतकरी हरी मुरमुरे यांच्या नांगरणीच्या बैलाला तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामुळे मुरमुरे यांचे ऐन शेती हंगामात मोठे नुकसान झाले असून ही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी तळवली महावितरण शाखा अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
अधिक माहिती अशी की, वडद डाफलेवाडी येथील हरी मुरमुरे हे आपले शेत नांगरणी करण्यासाठी रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान दोन शेतांची नागरणी केल्यानंतर त्यांनी आपले बैल चरण्यासाठी सोडून दिले होते. मात्र यावेळी तेथील शेरी पीर येथे बैल चरण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी तुटलेल्या महावितरणच्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन त्यांच्या एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे आपले ऐन शेती हंगामात मोठे नुकसान झाले असून सुमारे ३० हजार इतके आपले नुकसान झाले असल्याचे त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. आपल्याला लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी महावितरणकडे केली आहे.