आमदार जाधव, पालपेणेत युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक
गुहागर : त्यागाचे प्रतिक असलेला भगवा हाती घेण्यासाठी मजबुत मनगटांची आवश्यकता असते. त्यासाठी आज आलेली शिथिलतेची राख काढून मनातील शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेला युवासैनिक तयार झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करु या. असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले. तर युवा सैनिकांनी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कार्यरत व्हावे असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी केले. ते गुहागर तालुक्यातील युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
गुहागर तालुक्यातील युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पालपेणे मार्गावरील भवानी सभागृहात पार पडली. बैठकीच्या सुरवातीला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम आणि युवा सेना रत्नागिरी विस्तारक अतुल लोटणकर, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या उपस्थित झाला.
[bsa_pro_ad_space id=1]
त्यानंतर मार्गदर्शन करताना दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम म्हणाले की, युवकांची ताकद लक्षात घेवून शिवसेनेत कार्यरत झाल्यावर आदित्य ठाकरेंनी युवासेनेची स्थापना केली. आपल्या वयाचा मुलगा नेतृत्त्व करतोय याचा प्रभाव तरुणांवर पडला. त्यातून युवासेनेची ताकद वाढत गेली. युवासैनिक काय करु शकतो हे दापोली तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वांनी पाहिलं. तेथील 40 सरपंच हे पस्तीशीतील आहेत. याचा अर्थ ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजुला ठेवा असा नाही. अनुभवाशिवाय कोणतही राजकारण खेळता येत नाही. अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. राजकारण करण्याची शैली तुम्हाला अनुभवतातून विकसीत करावी लागेल. काही वेळा तुम्हाला तुमच्या खिशातील पैसे खर्च करावे लागतात. परंतु लोकप्रतिनिधी होण्यासाठी राजकारण करण्याची गरज नाही. लोकांची कामे करत रहा. जनता तुम्हाला स्विकारेल. पण विकासाची व्याख्या म्हणजे रस्ते, पुल, सभागृह ही नाही. ते कायम होतच रहाणार आहेत. युवकांच्या हाताला रोजगार देणे ही काळाची गरज आहे. युवकांनी स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. सहकार, मार्केटींग आणि युवक, महिलाबचत गट यांच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग, प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. युवासेनेचे काम करणारा कार्यकर्ता कधीही उध्वस्त होणार नाही याची काळजी शिवसेना, युवानेते आदित्य ठाकरे घेत आहेत. युवक असताना शिवसैनिक झालेले आमदार भास्कर जाधव यांच्या अनुभवाचा फायदा घेवून येथील युवासैनिकांनी संघटना मोठी करावी. असे आवाहन आमदार योगेश कदम यांनी केले.
याच बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी युवासैनिकांना पूर्वीच्या शिवसेनेची आठवण करुन दिली. आमदार जाधव म्हणाले की, आज वाहनांची उपलब्धता आहे. मात्र आम्ही शिवसेनेचे कामाला सुरवात केली तेव्हा गाडी घोडे नव्हते. मिळेत त्या वाहनाने शिवसेनेच्या सभेला जायचं. शिवसेनाप्रमुखांचा शब्दन् शब्द ऐकायचा. तो सत्यात उतरविण्यासाठी झुंझायचं. या काळातले आम्ही शिवसैनिक. आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या. ग्रामपंचायतीपासून केंद्रीय मंत्र्यापर्यंत प्रत्येकाच्या विरोधात त्यावेळी शिवसैनिक लढले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 69 शिवसैनिकांनी प्राण दिले तो आजचा दिवस. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि भगवा यांच्यासाठी काम करणारा, प्राण देणारा शिवसैनिक होता म्हणून शिवसेना उभी राहीली. भगव्याकरीता आपल्याला आयुष्यभर काम करायचे आहे. भगवा त्यागाचं प्रतिक, उपभोगाचे नाही. तो हातात घेण्यासाठी कसलेली, मजबुत मनगट हवीत. आपल्या हातात हे बळ येण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि शिवसेनेचे काम सातत्याने करत रहाण्याचे व्रत युवकांनी घेतले पाहिजे. शिवसेनेला कोकणाने मोठी साथ दिली आहे.
एक काळ होता शिवसेनेचा भगवा दिसला की तो पहिल्यांदा मला कसा मिळेल यासाठी स्पर्धा लागायची. आज युवा सेनेच्या आजच्या मेळाव्यात भगवा कुठेच दिसला नाही. गाडीला भगवा नाही. वातावरण निर्मितीसाठी टीशर्ट आणले ते सुद्धा कुठेही दिसत नाहीत. शिवसेनेचे चैतन्य, शिवसेनेची आग, सळसळणारं रक्त हिच शिवसैनिकाची ओळख. पण ही ओळखच आज दिसत नाही. आज मेळावा सुरु झाल्यानंतर हलत डुलत युवासैनिक येत होते. व्यासपीठावरुन भाषणे सुरु झाली तरी अनेकजण मोबाईलमध्येच मग्न होते. अन्य पक्षांमध्ये अध्यक्ष, सभासद असतात शिवसेनेत फक्त सैनिक असतात. सैनिकामध्ये असलेली उर्जा, चैतन्य, रुबाब दिसला पाहिजे. शिथलतेची राख बाजुला सारुन भविष्यात माझ्या पध्दतीने सळसळत्या रक्ताची, चैतन्याची युवासेना उभी करायची आहे.
यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, युवा सेनेचे विस्तारक अतुल लोटणकर, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनीही युवासैनिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला माजी जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, गुहागर तालुका युवासेना अधिकारी अमरदिप परचुरे, तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, गुहागरचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, विनायक मुळे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.