गुहागर : ( सौ. प्राजक्ता जोशी, आरेगाव) कोकणातील खेड्यात फार पूर्वीपासून श्रमदानातून अनेक कामे केली जातात. वाडीसाठी, गावासाठी सार्वजनिक सभागृह, पाखाड्या, रस्ते बांधणे, पावसाळ्यापूर्वी लाईटची मेन लाईन व रस्त्याच्या कडेची झाडी तोडणे, गावातील शाळा व मंदिरांच्या परिसराची साफसफाई, नद्यांवर बंधारे बांधणे अशा स्वरूपाची अनेक कामे लोकसंघटनाच्या माध्यमातून केली जातात.
For the village, Public works such as construction of public halls, pakhadas, roads, main line of lights and roadside bushes before the monsoons, cleaning of school and temple premises in villages, construction of dams on rivers are carried out through Lok Sanghatana.
पुढे कालांतराने ही कामे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत आली आणि लोकांनी श्रमदान करणे मागे पडत गेले. या सामाजिक गोष्टी हळूहळू काही प्रमाणात लोप पावत गेल्या. पण तालुक्यात अशी काही गावे आजही आहेत जिथे ग्रामस्थ शाळा,देऊळ,रस्ते यासाठी आजही श्रमदान करतात. आरे हे त्यापैकीच एक…!!
गुहागर पासून 8,9 कि.मी अंतरावर असणाऱ्या आरे गावात रोजगार हमी योजनेतून रस्ता होऊन अनेक वर्षे लोटली होती, पण मोठे चढ , सुरवातीला फक्त खडीकरण असलेला कच्चा रस्ता, पावसाळ्यात रस्त्यावर होणारा चिखल, मोठी वाहने वळवायला रस्त्याच्या शेवटी पुरेशी जागा नसणे अशा अनेक कारणांनी गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कुंभवणे वाडी येथे st जायला सुरवात होऊन फक्त 2 दशके झाली असतील. या रस्त्यावर इतर 3 वाड्या देखील अवलंबून आहेत. पण डांबरीकरण झाल्या नंतर व एसटी शेवटच्या वाडीपर्यंत जायला सुरुवात झाल्याचा फायदा मात्र येथील ग्रामस्थांना सलग असा कोणत्याही त्रासाशिवाय कधी घेताच येत नाही.
कधी रस्त्यात पडलेले मोठे खड्डे, चढावर खराब झालेला रस्ता, वाटेतील छोट्या ओढ्यावर बांधलेल्या पुलाचे नादुरुस्त होणे, कुठे बांध घसरणे, पावसाळ्यात रस्त्यावर माती येणे अशी छोटी छोटी संकटे देखील या रस्त्यावर असणारी एसटीची वाहतूक बंद होण्यास कारणीभूत ठरतात. मग लोकांकडे पर्याय राहतो खाजगी वाहतूक किंवा स्वतःची पायगाडी!!! रिक्षा सारखे वाहन एका सिंगल फेरीचे 250 रुपये घेत असल्याने शेवटी लोक आपल्या पायावर मदार ठेवतात.
बरेचवेळा एसटी फक्त ब्राह्मणवाडी पर्यंत येते त्यामुळे पुढील वाड्यांना पूर्ण दोन कि.मी चा चढ स्व-पायबळावर चढण्याशिवाय पर्याय नसतो. यात म्हातारी माणसे व आजारी लोकांचे खूप हाल होतात. रिक्षा परवडत नाही व st येत नाही अशी अवस्था असते. शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुले देखील सकाळी सकाळी धावत पळत एसटी पकडतात. येथील लोकांकडे स्वतःचे चारचाकी वाहन घेऊन येणारे पाहुणे देखील आपली वाहने अर्ध्या रस्त्यात ठेऊन चालत जाणे पसंत करतात किंवा चालू न शकणारे नातेवाईक येतच नाहीत.
गेल्या 2 वर्षात तर ब्राह्मणवाडी ते कुंभवणे या रस्त्याची अवस्था अति दयनीय झाली असल्याने ‘एसटी देवता’ वारंवार नाराज होत असते. ग्रामपंचायत तात्पुरती मलमपट्टी करून इलाज करते पण जिथे सर्जरी ची गरज आहे तिथे ड्रेसिंग करून काय उपयोग होणार. आतादेखील गणपतीच्या आधी पासून एसटी बंदच होती. पावसात नदीजवळचा वाहून गेलेला बांध ग्रामपंचायतीने दुरुस्त केला,पण 2 वर्षे रस्त्याची झालेली दुरवस्था तशीच आहे.
शेवटी तूच आहेस तुझा शिल्पकार असे म्हणून लोकांनीच आपली गरज आपणच काही प्रमाणात भागवावी व तात्पुरती सोय करावी या हेतूने घडवलेवाडी, पारदळेवाडी व कुंभवणेवाडी या तिन्ही वाडयांच्या ग्रामस्थांनी एकत्र येत आपली पूर्वापार चालत आलेली श्रमदानाची परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करत रस्त्यावर माती टाकून निदान एसटी येईल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. आज रस्त्याची दुरवस्था पाहता इथे कधीकाळी डांबर होते असे स्वप्नात पण वाटणार नाही.पण आता आमच्याकडे मातीचा तरी रस्ता आहे असे आम्ही नक्की सांगू शकतो. राजकीय पक्षांच्या मारामारीत शेवटी मूलभूत गरजा देखील खेड्यातील माणसांना मिळू शकत नाहीत यापेक्षा दुर्दैव ते कोणते? गावी येताना गुहागर पर्यंत फोरट्रॅक , गुहागर मध्ये चकाचक गल्लीबोळ पण गावात आल्यावर खांद्यावर बॅग घेऊन घरापर्यंत पुर्वीचिच पायपिट अजूनही चाकरमान्यांच्या नशीबात आहे,यालाच विकास म्हणायचे का? असा संभ्रम पडतो. पण विकासाची स्वप्ने बघत स्वतः श्रमदान करून आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या आरे गावातील या तीन वाडयांमधील सर्व ग्रामस्थांचे या उत्तम कामाबद्दल मनापासून कौतुक….!!! व लवकरच रस्त्याचा प्रश्न कोणते तरी सरकारी खाते किंवा कोणतातरी राजकीय पक्ष सोडवेल व लोकांची त्रासातून सुटका होईल यासाठी शुभेच्छा..!!