कोकण हायवे समन्वय समितीची मागणी
मुंबई : गेली अठरा वर्षे पनवेल ते इंदापूर आणि गेली पाच वर्ष इंदापूर रत्नागिरी ते झाराप दरवर्षी पावसाळ्यात हा खड्डे महामार्ग होतो काही ठिकाणी अक्षरशा पायवाट होते. पुढील पंधरा दिवसात हा रस्ता खड्डेमुक्त व्हावा. आणि यापुढे दरवर्षी पावसाळ्यात सुद्धा आम्हाला खड्डेमुक्त चांगल्या दर्जाचा रस्ता कायमस्वरूपी मिळावा, अशी मागणी कोकण हायवे समन्वय समितीने केली आहे.
हायवे 2018 साली पूर्ण होणार होता. पनवेल इंदापूर गेली अकरा वर्षे काम सुरू आहे. इंदापूर रत्नागिरी झाराप चारशे किलोमीटरचा हायवे गेली सहा वर्षे काम सुरू आहे. अतिशय संथ गतीने चालू असलेल्या या कामामुळे कोकणच्या विकासाच्या प्रक्रियेला आणि पर्यटन उद्योगावर प्रचंड परिणाम झालेला आहे. या हायवे वर काम करणारे काही चुकीचे कॉन्टॅक्टर याचा मनस्ताप संपूर्ण कोकणातील जनतेला सहन करावा लागत आहे. युद्धपातळीवर ठरल्याप्रमाणे हायवे 2022 मध्ये पूर्ण व्हावा. आणि त्यानंतर बारमाही अगदी पावसाळ्यात सुद्धा खड्डेमुक्त महामार्ग कोकणातील जनतेला आणि कोकणात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना मिळावा.
हा महामार्ग देशातील सर्वात अपघात प्रवण आणि धोकादायक समजला जातो. भारताचे नागरिक म्हणून आम्हा कोकणवासीयांना दर्जेदार आणि सुरक्षित महामार्ग मिळणे गरजेचे आहे. या हायवेवरील ठेकेदारांनी पूर्वी जसा वळणावळणाचा हायवे होता जवळपास तसाच हायवे दोन्ही बाजूला वाढवला आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी शेकडो अपघात करणारी धोकादायक वळणे आणि घाट मार्ग आहेत. हा महामार्ग बनवताना यातील अनेक वळणे सरळ करणे आवश्यक होते. काही प्रमाणात हे काम झाले परंतु अनेक ठिकाणी ही वळणे आणि घाट मार्गे तसेच धोकादायक आजही आहेत. याचा पुन्हा समितीच्या तज्ञ सदस्यांसोबत अधिकाऱ्यांनी एकत्र दौरा करून यातील अतिधोकादायक जे जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी आवश्यक ते बदल करावेत. जिथे जिथे वळणे सरळ करता येतील तिथे तिथे ती प्राधान्याने केली जावीत. प्रवाशांच्या आणि कोकणवासीयांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.
या हायवेवर अनेक महत्त्वाचे जंक्शन आहेत जेथे आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांमधून गाड्या थेट हायवेवर येतात. आणि पलीकडे जाण्यासाठी थेट हायवेवर क्रॉसिंग करतात. अशा ठिकाणी आता खूप अपघात होऊ लागले आहेत. अशा महत्त्वाच्या नाक्यांवर अंडरपासची आवश्यकता आहे. गाड्या थेट हाय वर येऊ नयेत म्हणून सर्विस रोडचे आवश्यकता आहे. असे धोकेदायक जंक्शन निश्चित करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करावेत.
हायवेवर काही मोठे गाव आहेत किंवा गाव एका बाजूला आणि शाळा दुसऱ्या बाजूला. किंवा अर्धा गाव हायवेच्या याबाजूला आणि अर्धा गाव हायवेच्या त्या बाजूला. अशा ठिकाणी तज्ञ समितीने विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा गावकऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी अंडरपास किंवा आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. या हायवे वर अनेक ठिकाणी ठेकेदाराने बेजबाबदारपणे काम केले आहे. अतिशय अरुंद सर्विस रोड अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. हा हायवे सिंधुदुर्ग जिल्हा आणि राजापूर तालुका येथे पूर्ण झालेला आहे ही समाधानाची बाब आहे. याकरता संबंधित यंत्रणांचे आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. परंतु ठेकेदारांनी बेजबाबदार काम केल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड अडचणी सहन करावा लागत आहे. या अडचणींचा अभ्यास करून यातले महत्त्वाच्या विषयांवर तोडगा तातडीने काढला जावा. उर्वरित दोनशे किलोमीटर हायवेचे काम सुरू आहे त्या हायवेवर या अगोदर झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
कोकण हा देशातील नाही जगातील सर्वात निसर्ग समृद्ध जैवविविधता असलेला प्रदेश आहे. त्यामुळे हा हायवे देशातील सर्वात निसर्ग समृद्ध आणि जैवविविधता असलेला हायवे म्हणून ओळखला जावा. या हायवेच्या दोन्ही बाजूला सह्याद्रीमध्ये सापडणारे सर्व प्रकारची झाडे लावावी आणि देशातील सर्वात मोठी पाचशे किलोमीटरची बॉटनिकल गार्डन या हायवेच्या दोन्ही बाजूला विकसित व्हावी. हायवे पनवेल ते झाराप पूर्ण होईपर्यंत. कोणत्याही स्वरूपाचा टोल या हायवेवर आकारला जाऊ नये. हायवे निर्माण करताना झालेला उशीर आणि यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील नागरिकांना झालेला मनस्ताप आणि याचा कोकण प्रदेशाचा विकास वर झालेला परिणाम लक्षात घेऊन रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजेच mh 09 ,mh 08 mh 07. हे वाहन क्रमांक असलेल्या स्थानिक गाड्यांना कोणत्याही स्वरूपाचा टोल आकारला जाऊ नये. हा हायवे देशातील सर्वात निसर्ग सुंदर हायवे बनवण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी बरोबर समन्वय करून सर्व प्रकारचे सहकार्य हायवे निर्माण करणाऱ्या यंत्रणांना देण्याचे काम कोकण हायवे समन्वय समिती यापुढील काळात करेल. आमच्या प्रत्येक तालुक्यातला समित्या याकरता शासकीय यंत्रणांना मदत करतील.
या हायवेवर दर वीस किलोमीटरवर या बाजूला आणि त्या बाजूला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने फार्मर मार्केट च्या पायाभूत सुविधा नॅशनल हायवे अथोरिटी ने निर्माण करून द्याव्या. आजूबाजूच्या गावातील शेतकरी आपल्या शेतातील पिके आणि प्रक्रिया उत्पादने या फार्मर मार्केटमध्ये विकू शकतील त्यामुळे आजूबाजूच्या गावांना या हायवेचा आर्थिक फायदा होईल. लोकसहभागातून देशातील एक आदर्श महामार्ग निर्माण व्हावा अशा स्वरूपाचा प्रयत्न हायवे निर्माण यंत्रणाबरोबर कोकणातील सामाजिक संस्थांच्या मदतीने कोकण हायवे समन्वय समिती करू शकेल, असे कोकण हायवे समन्वय समिती संजय यादवराव यांनी सांगितले.