तहसीलदार सौ. धोत्रे, गुहागरमध्ये आरक्षणाची सोडत पूर्ण
गुहागर, ता. 25 : कोणतीही व्यक्ति कोणत्याही प्रवर्गातून निवडून आली असली तरी सरपंच पदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे त्या प्रवर्गातील ती व्यक्ति असेल तर कायदेशीर बाबी पूर्ण करुन ती व्यक्ति सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून पात्र ठरु शकते. असे प्रतिपादन आरक्षण सोडतीच्या वेळी गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी केले. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत सदस्यांमधील सरपंच पदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गुहागरमधील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत आज भंडारी भवन येथे काढण्यात आली. हे आरक्षण 2021 ते 2025 या पाच वर्षांकरीता लागू असणार आहे. 50 टक्के महिला आरक्षणाप्रमाणे 33 ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये कोतळूक ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती (स्त्री) साठी आरक्षित करण्यात आले. तर नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये महिला सरपंच पदासाठी 9 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे अंजनवेल, अडूर, वेलदूर, चिंद्रावळे, आबलोली, तळवली, जानवळे, पालपेणे, हेदवी, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 23 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये साखरी आगर, पांगारी तर्फे वेळंब, गोळेवाडी, गिमवी, वेळंब, काताळे, कुटगिरी, रानवी, चिखली, कौंढर काळसूर, शिवणे, मढाळ, आंबेरे खूर्द, असगोली, कोसबीवाडी, पेवे, परचुरी, सडेजांभारी, निगुंडळ, वडद, काजुर्ली, साखरी बुद्रुक आणि पोमेंडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
उर्वरित 33 ग्रामपंचायतींमधील सरपंच पद स्त्री किंवा पुरुष यांच्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. खोडदे ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 9 ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये पालशेत, पाटपन्हाळे, पडवे, वेळणेश्वर, धोपावे, कुडली, आरे, नरवण, झोंबडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उर्वरित मासू, शिर, कोळवली, पाचेरीसडा, आवरे असोरे, भातगांव, पालकोट त्रिशुळ, मुंढर, उमराठ, कारुळ, विसापूर, पांगारी तर्फे हवेली, खामशेत, सुरळ, मळण, साखरी त्रिशुळ, वरवेली, पाली, पिंपर, पाभरे, पाचेरी आगर, जामसूद आणि कोंडकारुळ या 23 ग्रामपंचायतीचे सरंपच पद सर्वसाधारण आरक्षित करण्यात आले आहे.
आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी शंका विचारल्या. त्यावेळी तहसीलदार सौ. लता धोत्रे म्हणाल्या की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 30, पोटकलम 6 चे 1 यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी आहे त्या प्रवर्गातील कोणताही ग्रामपंचायत सदस्य उमेदवार म्हणून पात्र ठरु शकतो. मात्र आरक्षणाच्या प्रवर्गासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करणे त्या उमेदवारला बंधनकारक आहे. तहसीलदारांच्या प्रतिपादनामुळे अनेकांच्या मनातील गैरसमज दूर झाले आहेत.