गुहागर : तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून विकसीत झालेली, मोठी ग्रामपंचायत वेळणेश्र्वर आज बिनविरोध झाली. येथील चार प्रभागातून 11 जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 7 डमी उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे 35 वर्षांनी वेळणेश्र्वर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले.
सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ. नेत्राताई ठाकूर आणि गेली पाच वर्ष सरपंच राहीलेले नवनीत ठाकूर यांनी केलेल्या काम यांचे काम ही देखील वेळणेश्र्वरची ओळख आहे. तसेच राजकीय दृष्ट्या १० वर्षांपूर्वी तालुक्यातील वेळणेश्र्वर या एकमेव ग्रामपंचायतीत मनसेची सत्ता होती.
वेळणेश्र्वर गावातील राजकारण गेली ५ वर्ष सरपंच नवनीत ठाकूर व सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या भोवती फिरत होते. या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीवर नवनीत ठाकूर यांचे वर्चस्व राहील अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र या अटकळीला धक्का बसला आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तरुणांनी वाडीनिहाय बैठका केल्या. सर्व वाड्यांचे प्रतिनिधीत्व असलेली कोअर कमिटी ठरविण्यात आली. उमेदवार निवडीसह ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी आचारसंहिता ठरविण्यात आली. त्यामध्ये उमेदवार प्रभागाबाहेरचा नको, कोअर कमिटी सरपंच, उपसरपंचाचा निर्णय घेईल तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील. प्रत्येक ग्रामसभा, मासिक सभेपूर्वी व नंतर लोकप्रतिनिधी आणि कोअर कमिटीची बैठक होईल. असे अनेक मुद्दे या आचारसंहितेत नमुद आहेत. त्याला अनुसरुन प्रभाग १ (गुढेकर वाडी वेदवाडी खारवीवाडी), प्रभाग २ (बाजारपेठ), व प्रभाग ३ (भाटी, आगरवाडी, गोनबरेवाडी, पाडावे वाडी, ओझरवाडी) मधील उमेदवारांची निश्चिती झाली.
या सर्वांपासून वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्र. 4 (वाडदई) बाजुला होता. आमचे उमेदवार गणशोत्सवात मुंबईकरांसोबत झालेल्या सभेत ठरले आहेत. त्या उमेदवारांना सोबत घेवून आम्ही गावपॅनेल बरोबर आहोत. अशी भूमिका प्रभाग ४ मधील ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे गावपॅनेलने तेथे उमेदवार उभे केले नाहीत. परिणामी बाजारपेठत रहाणाऱ्या सरपंच नवनीत ठाकूर यांच्यासह ठाकूर गटाचे अन्य दोनजण प्रभाग 4 मधून बिनविरोध आले आहेत. अशारितीने ग्रामपंचायत वेळणेश्र्वरची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
राजकीय क्लेश संपुष्टात येण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येवून ज्येष्ठ मंडळींना सोबत घेवून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलाय.
अमोल जामसुतकर, वेळणेश्र्वर
वेळणेश्र्वर मधील तरुणांनी गावातील वाडीप्रमुख आणि प्रतिष्ठीत मंडळींना सोबत घेवून ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल 35 वर्षांनी बिनविरोध केली. हे सर्व कसे घडले ते ऐकुया वेळणेश्र्वर मधील तरुण कार्यकर्त्यांकडून…