विकासप्रश्र्नांबाबत कुचंबणा होत असल्याने नाराजी
गुहागर, ता. 03 : गुहागर नगरपंचायतीमधुन बाहेर पडून ग्रामपंचायतीमध्ये रुपांतर झालेल्या असगोलीमध्ये सध्या नगरपंचायतीत होता ते बरे होते अशी कुजबुज सुरु आहे. याची जाहीरपणे वाच्यता कोणीच करत नाही. मात्र लसीकरण, पाणी प्रश्र्न, पथदिप आदी पायाभुत सुविधांसाठी कायमच संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी आहे.

2012 मध्ये गुहागर नगरपंचायतीची स्थापना झाली तेव्हा असगोली गावाचा नगरपंचायतीमध्ये समावेश होता. मात्र असगोली ग्रामस्थांनी नगरपंचायतीमधील समावेशाला कडाडून विरोध केला. राज्य सरकार विरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजप असगोलीवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर मे 2017 मध्ये असगोलीला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला. गावाने आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली.

आज साडेचार वर्षांनी याच असगोलीमध्ये ग्रामपंचायत नको नगरपंचायत बरी होती. ही भावना बळावू लागली आहे. असगोली ग्रामपंचायत झाली. पण त्याआधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्याने ग्रामपंचायतीचे प्रश्र्न धसास लावणारा हक्काचा लोकप्रतिनिधी असगोलीवासीयांकडे नाही. परिणामी गावाचा विकास थांबला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे नियोजन झाले. पण जिल्हा परिषदेच्या आराखड्यात असगोलीचे नावच नव्हते. गुहागर नगरपंचायतीने आपल्याकडील लसीकरणात असगोलीवासीयांना समाविष्ट केले नाही. अखेर गावातील कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कोट्यातून लस देण्यात आली.
मनिषा कन्स्ट्रक्शनने रस्त्याचे काम करताना दोन वेळा असगोली ग्रामपंचायतीची जलवाहीनी तोडली. त्यामुळे ऐन मे महिन्यात पाणी टंचाईची वेळ असगोली गावावर आली. हा प्रश्र्न सोडवण्याकडे मनिषा कन्स्ट्रक्शनने दुर्लक्ष केले.
कोरोना संकटापासून ग्रामसभा झालेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांच्या सभा होत नाही. अशावेळी ग्रामसेवकाने पुढाकार घेवून गावातील समस्या सोडविण्यासाठी निधी आणण्याची आवश्यकता होती. परंतू ग्रामसेवकाने गावाच्या विकासात लक्ष घातलेले नाही. त्याच्यांकडे पालशेत ही मोठी ग्रामपंचायत असल्याने असगोली ग्रामपंचायतीचा अनिवार्य प्रशासकीय कारभार केवळ ते पहात आहेत.
2017 मध्ये ग्रामपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस नगरपंचायतीकडून रेकॉर्ड आणण्यात गेले. त्यानंतर प्रशासकीय कामकाजाला सुरवात झाली. परंतु विकासाच्या कामांना गतीच मिळालेली नाही. आजही अपुरा पाणी पुरवठा, पथदिप नाहीत, पुरेशी लस मिळत नाही. अशा अनेक समस्या असगोलीवासीयांना भेडसावत आहे. या सर्व समस्यांमुळे असगोलीवासीयांमध्ये प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. म्हणूनच ग्रामपंचायत नको नगरपंचायत बरी होती हा विचार असगोलीत चर्चिला जात आहे.
(Asgoli, which was transformed into a Grampanchayat after leaving Guhagar Nagar Panchayat, is now wants to disolve in the Nagar Panchayat Again. Obviously no one makes it legible. The people of Asgoli do not have Panchayat Samiti Representative, Zilha Parishad Representative to solve the problem of Villeges from Government. As a result, the development of the village has stopped. However, the villagers are dissatisfied with the Government as they have to fight for basic facilities like vaccination, water supply, street lighting etc. Hence the villegers thinking as Nagar Panchayat is better than Gram Panchayat.)
