मसाले उद्योगातील कोकणी मुद्रा
Known about Khatu Masale Udyog
वडिलांच्या पिठाच्या गिरणीत मसाले बनवून विकतानाच उद्योगाचे तंत्र आणि मंत्र शिकत शाळीग्राम खातूंनी मसाले उद्योगाचे स्वप्न पाहिले. दुकानदारांनी मार्केटींग शिकवले. पहिली तीन वर्ष व्यवसायातून नफा होत नव्हता. त्यातूनच उत्पादन बनविण्यासाठी आवश्यक दर्जेदार कच्चा माल कसा खरेदी करायचा याचे गणित उमगले. उद्योग वाढीसाठी आवश्यक कर्ज उभे करण्यातून बँकिंगचा अभ्यास झाला. कारखान्यातील अपघाताने संघर्षातून जिद्दीने उभे रहाण्याचा धडा दिला. अशाप्रकारे चिकाटी, अथक परिश्रम, सचोटीचा व्यवहार या सर्वांतून गुहागरमध्ये शाळीग्राम खातूंनी खातू मसाले उद्योग Khatu Masale Udyog उभा केला. 90 च्या दशकात या उद्योगाला सोनेरी दिवस आले. जिल्हा उद्योग केंद्र, बिझनेस एक्सप्रेससह 4 राष्ट्रीय पुरस्काराने खातू मसाले उद्योगाचा सन्मान झाला. आज खातू मसाले उदयोगाने मुंबईसह कोकणात पाय रोवले आहेत. ॲमेझॉनसारख्या ई कंपनीत स्थान मिळवले आहे. परदेशस्थ कोकणवासीयांच्या पंसतीस उतरला आहे. व्यावसायिक यश मिळवतानाच सैनिकांच्या कल्याणासाठी, वृध्दांच्या सेवेसाठी, कॅन्सरवरील संशोधनासाठी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम खातू मसाले उद्योग करत आहे.

Khatu Masale Udyogचा जन्म
1978 साली शाळीग्राम खातू गुहागरात किराणा मालाचे दुकान चालवू लागले. वडीलांबरोर फ्लोअर मिलमध्येही लक्ष घालु लागले. वडिल दादा खातू ग्राहकांना मसाले दळून देत. हे मसाले बाजारपेठेत, इतर दुकानात विक्रीला ठेवण्याचा सल्ला खेडच्या भैया खातूंनी दिला. त्यातूनच खातू मसाले उद्योग Khatu Masale Udyog जन्माला आला. मग हातानेच तयार केलेली लेबल लावून ते मसाले मोठ्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी ठेवण्यास शाळीग्राम खातूंनी दाभोळ, दापोली भागात फिरण्यास सुरूवात केली. परंतु बोलायचे काय हे मोठे प्रश्नचिन्ह. मग माहितीपत्रक तयार केले. बोलण्याची सवय नाही, साधी लेबल आणि साधे माहितीपत्रक घेऊन आलेल्या शाळीग्राम खातुंना काही व्यापारी परत पाठवायचे. हळुहळु आपल्या उत्पादनांविषयी माहिती सांगण्याचे तंत्र, व्यापाऱ्यांना आपला माल देण्याची कला शाळीग्राम खातू शिकले. दाभोळच्या शहा ह्या व्यापाऱ्यांनी अंतर्देशीय पत्र लिहून आमचे ग्राहक मसाले चांगले असल्याचे सांगतात. तरी तुमचे मसाले आम्हाला विक्रीला द्यावेत असे कळवले. या पत्रामुळे आपण हाच उद्योग करायचे हा निश्चय दृढ झाला.
1981 सालपर्यंत मसाले उद्योगाचा ताळेबंद वडील कै. शांताराम खातू पहात असत. एवढी मेहनतं करुनही हाती शिल्लक रहात नाही म्हटल्यावर वडीलांनी व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या. पण नफा होत नसला तरी तोट्यात नाही. बाजारात कोणाचे देणे नाही. धंदा वाढतोय. हे लक्षात घेवून मसाले उदयोग वाढवायचा निश्चय शाळीग्राम खातूंनी केला. वडिलांकडे एक वर्षाची मुदत मागुन सर्व व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. अभ्यासातून चुकीच्या ठिकाणी केलेल्या खरेदीमुळे हाती शिल्लक रहात नाही हे लक्षात आले. चुकांतून शिकत रहाणे हीच उद्योजकाची ओळख असते त्याप्रमाणे शाळीग्राम खातूंनी व्यवसायातील नफा वडीलांना दाखवून दिला. मग घरातून मिळालेल्या प्रोत्साहनाच्या बळावर व्यवसायही वाढु लागला. 1983 साली गुहागरची जागा पूरत नाही म्हणून शाळीग्राम खातू यांनी मसाला व्यवसाय अंजनवेल येथे आपल्या सासुरवाडीला हलवीला. 1984 साली गुहागर एस्.टी.स्टॅण्ड समोर मसाले विक्रीसाठी खोक्याला जागा मिळाली. अंजनवेलला मसाले तयार करायचे. गुहागरात पॅकिंग करुन एस.टी. पार्सलद्वारे पाठवून द्यायचे. या प्रक्रियेतून खातू मसाले उद्योग उभा रहात होता.
पहिली फॅक्टरी
1987 साली गुहागरला खोक्याच्या मागची जागा मिळाली. तीथं फॅक्टरी युनीट सुरू करण्यात आले. या फॅक्टरीसाठी आवश्यक असणारे भांडवल आपणच गुंतवले तर उत्पादनावर परिणाम होईल. हे लक्षात घेवून बँक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC) यांच्याकडे गेले. महत्प्रयासाने 1985 साली 2 लाख 75 हजाराचे कर्ज मंजूर झाले. इथून खातू मसालेचा बॅकिंग क्षेत्राशी संपर्क खऱ्या अर्थाने सुरू झाला.
10 वर्षांच्या कष्टप्रद पण व्यवसाय वृद्धीच्या प्रवासात 1988 साली मोठं वादळं आलं. गुहागरच्या फॅक्टरीत नव्याने बसविलेल्या भाजणी मशिनचा स्फोट झाला. शाळीग्राम खातू यांच्यासह 1 महिला तेलाने भाजली. 4 महिने अंथरुणावर झोपून शाळीग्राम खातू धंदा पहात होते. संकटात जिद्दीने उभे रहाण्याची शिकवण नियतीने दिली.
1989 मध्ये खातू मसाले ने पहिली डिलेव्हरी व्हॅन खरेदी केली. खातू मसाले उद्योग Khatu Masale Udyog असे रंगवलेली केलेली व्हॅन रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात जाऊ लागली. धंदा वाढला. आता गुहागर बसस्थानकासमोरील जागाही अपुरी पडू लागली.

Khatu Masale Udyog
महाराष्ट्र वित्तीय महामंडळाने (MSFC) पाटपन्हाळेतील परिसरात एक जागा लिलावात विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. ती जागा खातूंनी विकत घेतली. त्या जागेत कारखाना उभा करण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी भास्कर दत्ते यांच्याकडे 9 लाखाची मागणी केली. हे पैसे कमी पडतील असे सांगत अन्य मसाला उद्योगांचा अभ्यास करुन आवश्यक मशिनरी, इमारत या सर्वासह प्रकल्प अहवाल बनविण्यास सांगितला. कोकण विकास महामंडळाद्वारे कर्ज प्रकरण करण्यास सांगितले. दत्तेंच्या मार्गदर्शनामुळे 9 लाखाच्या ठिकाणी 30 लाखांचे कर्ज मंजूर झाले. पाटपन्हाळे येथे 1 एकर जागेत त्या काळातली Khatu Masale Udyog अद्ययावत फॅक्टरी उभी राहीली.
फॅक्टरी पाटपन्हाळ्यात गेल्यावर प्रति दिवस 1 टनापेक्षा अधिक मसाले पॅकींग होतील अशी अद्ययावत मशीनरी बसली. उत्पादनात वाढ झाली. इतर नामवंत कंपन्यांप्रमाणे पॉलिपॅक मध्ये मसाले पॅक होऊ लागले. त्याचप्रमाणे उत्पादनांच्या संख्येतही वाढ झाली. मसाल्यासोबत मोदक पीठ, उपवासाची भाजणी, चकली मसाला, कोकणी वडा पीठ, नाचणी सत्त्व, मेतकुट अशा कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ सहजगत्या करण्यासाठी आवश्यक अशी उत्पादने या उद्योगाने बाजारात आणली. विशेष म्हणजे ही उत्पादने अन्य कंपन्यांपेक्षा महाग असूनही ग्राहकांच्या पसंतीची बनली आहेत. आज 41 पेक्षा जास्त उत्पादने बनविणारा एकमेव Khatu Masale Udyog अशी खातू मसालेची ओळख बनली आहे.

गुणवत्तेशी तडजोड नाहीच
पारंपरिक चव ही खातू मसालेंची ओळख आहे. असे मसाले तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल उत्तमच असाला पाहिजे याकडे खातू कुटुंबाचे लक्ष असते. मसाल्यामध्ये आवश्यक असणारी मिरची चविष्ट आणि लाल रंगाची असली पाहिजे म्हणून थेट कर्नाटकमधील बॅडगी मार्केटमध्ये जाऊन, पारखून घेतली जाते. त्याचप्रकारे काही विरहीत जिरे, धने, हळद आदी मालाची खात्री करुन खरेदी केली जाते. उन्हात वाळवल्यामुळे मसाल्याची पारंपरिक चव टिकून रहाते. म्हणून येथे गायीच्या शेणाने सारवलेल्या जमीनीवर वाळवण घातले जाते. असे विविध प्रयोग करुन खातू मसालेने आपल्या उत्पादनांची पारंपरिक चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. म्हणूनच बाजारपेठेत थोडी अधिक किंमत असूनही खातू मसालेच्या उत्पादनांची विक्री वाढत आहे. Khatu Masale Udyog
नव्या पिढीच्या नवकल्पना
1995 नंतर उद्योगाचा संघर्षाचा काळ संपला. उद्योग झपाट्याने वाढु लागला. शाळीग्राम खातूंचे दोन्ही मुलगे शैलेन्द्र आणि सुरज, सुना सौ. श्रुती व सौ. हेमांगी ही नवीन पीढी शाळीग्राम खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांनी उभ्या केलेल्या उद्योगामध्ये समरस झाली आहे. या नव्या पिढीने खातू मसाले उद्योगची वेबसाईट बनवली. ॲमेझॉनसारख्या कंपनीशी करार केला. त्यामुळे दुकानांमध्ये मिळणारे मसाले घरबसल्या मिळू लागले. परिणामी दुबई, ऑस्ट्रेलिया, यु.एस्.ए. आदी देशांत स्थायिक असलेल्या कोकणातील अनेक कुटुंबांमध्ये खातू मसाले वापरण्याचे प्रमाण वाढले. जाहीरातीची माध्यमे बदलली. सामाजिक माध्यमांबरोबर रेडिओ चॅनेलवर खातू मसाले झळकू लागले. गणपतीमध्ये पत्ते खेळले जातात हे लक्षात घेवून खातू मसालेने पत्त्यांचे कॅट बाजारात आणले. महिलांमध्ये पैठणीची क्रेझ असते. म्हणून खातू मसालेची उत्पादने वापरुन पदार्थ बनवा. त्याचा व्हिडिओ करा आणि पैठणी जिंका. अशी योजना आणली. असे विविध प्रयोग करुन खातू मसाले उद्योगाला (Khatu Masale Udyog) संपूर्ण महाराष्ट्रात पोचविण्याचे काम सध्या गतीने ही नवी पिढी करत आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योग
ज्या समाजामुळे आपण मोठे झालो त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो. या विचारांची बांधिलकी जपण्याचे काम खातू मसाले परिवार करु लागला. गुहागर तालुक्यातील अनेक संस्थांना, लोककलावंतांना विविध रुपाने हा उद्योग मदत करतो. पावसमधील अनुसया आनंदी आश्रमाची माहिती वृत्तपत्रातून कळल्यावर शाळीग्राम खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांनी या आश्रमाला भेट दिली. वृद्धाश्रमाला वर्षभर पुरेल इतका मसाला, नुतन इमारतीसाठी निधी दिला. त्याचप्रमाणे सासु सुनेचे निखळ नाते जपणाऱ्या, घरातील वृध्द आई वडिलांची सेवा सुश्रुषा करणाऱ्या कुटुंबाला रोख बक्षिस देणारी श्रावणबाळ योजना सुरु केली. वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबाना मदत व्हावी म्हणून आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडाला 1 लाखांची देणगी दिली. तर कॅन्सरवरील संशोधनाला मदत व्हावी म्हणून Tata Memorial Centre या संस्थेला 50 हजारांची देणगी दिली.
Khatu Masale Udyogला मिळालेले पुरस्कार
1994-95 : जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीचा जिल्हा उद्योजक प्रथम पुरस्कार.
1996-97 : बिझनेस एक्सप्रेसचा ‘व्यापार सेवा पुरस्कार’
2001 : ‘राजीव गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ दिल्ली
2005 : इंडियन इकॉनॉमिक् डेव्हलपमेंट आणि रिसर्च असोसिएशन, नवी दिल्लीचा ‘राष्ट्रीय उद्योग सन्मान पुरस्कार’.
2006 : ऑल इंडिया बिझनेस अँण्ड कम्युनिटी फाऊंडेशन, नवी दिल्लीचा ‘राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार’
2007 : सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट अँण्ड रिसर्च सोसा., पुणे यांचा ‘राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार’
2022 : सकाळ माध्यम समुहाचा आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार