आमदार भास्कर जाधव : निर्णयात हस्तक्षेप करणार नाही
गुहागर, ता. 14 : 2010 मध्येच पालशेत बाजारपेठ आणि पुलाला बाह्यमार्ग व्हावा यासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. येथील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जागांचा विषय सोडवून हा मार्ग होण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे तेथून सुरळीत वहातूक करता येईल. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचा विषय ताजा असताना बाजार पुलाजवळील नदीपात्रातील पाणी कमी होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या वहातुक बंदच्या निर्णयात मी हस्तक्षेप करणार नाही. अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांना दिली. पालशेत बाजारपुलाच्या पहाणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बुधवारी 14 जुलैला आमदार भास्कर जाधव यांनी मुसळधार पावसातही पालशेत बाजारपुलाची पहाणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार जाधव म्हणाले की, सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातील अनेक जणांना जीव गमवायला लागला. ही घटना ताजी असताना सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना निर्णय बदलायला लावण्याचे काम मी करणार नाही. वहातुकीसाठी पुल आपल्याला पर्यायी मार्गाचाच वापर करावा लागेल. पाणी कमी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकामाच्या अभियंत्यांनी पुन्हा एकदा पुलाची पहाणी करुन एकेरी वहातुकीसाठी पुल चालु ठेवणे शक्य आहे का याबाबतचा निर्णय घ्यावा. रामाणेवाडीमार्गे एस.टी. जावू शकते का याची पहाणी आगार व्यवस्थापक, तहसीलदार, उपअभियंता यांनी एकत्रीत एस. टी.ने जावून करावी. त्याचा अहवाल द्यावा. अशा सूचना मी प्रशासनाला केल्या आहेत. पालशेत गावाला बायपास करणाऱ्या रस्त्यासाठी 2010 मध्येच 70 लाख रुपये मी मंजुर केले आहेत. मात्र जागा जमीनींच्या अडचणीमुळे तो निधी आजही पडून आहे. काही ग्रामस्थांची जमीन त्यासाठी घ्यावी लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय तातडीने सरपंच आणि गावातील प्रतिष्ठीत मंडळींनी पुढाकार घेवून करावा. जेणेकरुन बाजारपेठ आणि बाजारपुलाला नवा बायपास मार्ग तयार होईल.
पुलाच्या दुरुस्तीमध्ये अडचणी
या पुलाच्या दुरुस्तीचा विचार 5 वर्षांपूर्वीही झाला होता. या पुलाची उंची 2 ते 3 मिटरने वाढवावी लागणार आहे. पुलाचीउंची वाढवताना दोन्ही बाजुला जोड रस्त्याची उंची त्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. त्याचा फटका बाजारपेठेतील अनेक घरांना, दुकानांना बसणार आहे. त्यामुळे अनेक वेळा नव्या पुलासंदर्भातील चर्चा या विषयाशी येवून थांबल्या आहेत. तरी देखील पुन्हा एकदा सर्व्हे करुन नव्या पुलाचे काम कशा प्रकारे करता येईल त्याचा आराखडा बनविण्यासाठी मी प्रयत्न करेन.
बाजारपुल मजबुत करण्याच्या सूचना
पावसाळ्यानंतर बाजारपुलाचे किती खांब कमकुवूत झालेत, किती खांबाचे कशाप्रकारे नुकसान झाले आहे याची तपासणी करावी. त्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांसोबत इथे येवू. त्या खांबांचे मजबुतीकरण कसे करता येईल यावर मार्ग काढला जाईल. त्यानंतर हा पूल पुर्ववत वहातूकीसाठी खुला करता येईल. अशी चर्चा बांधकामच्या अधिकाऱ्यांसोबत केली आहे.
अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
या पहाणी दौऱ्याच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, पालशेतच्या सरपंच सौ. संपदा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे, गुहागरच्या उपअभियंता कु. सलोनी निकम, तहसीलदार सौ. लता धोत्रे, आगार व्यवस्थापक वैभव कांबळे, पोलीस निरिक्षक अरविंद बोडके, पंकज बिर्जे, दीपक पालशेतकर, नीलेश विखारे, विनायक मुळे, गुहागर माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, निलेश मोरे, विनायक जाधव, दिपक कनगुटकर आदी उपस्थित होते.
प्रत्यक्ष पुलाच्या पहाणी दौऱ्यात काय झाले याचा व्हिडिओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.