अनंत पवार, विकास संस्थांच्या जीवावर बँक चालते
गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी अधिकाऱ्यांना हातीशी धरुन संगनमताने आम्हाला अपात्र ठरविले. विकास संस्थांच्या जीवावर जिल्हा बँका चालतात हे विसरुन विकास संस्थांवर अन्याय सुरु आहे. अशी तिखट प्रतिक्रिया शीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक अनंत पवार यांनी व्यक्त केली. The Chairman, Directors and Officials of Ratnagiri District Central Bank conspiratorially disqualified Voters.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने शीर सोसायटीचे 960 रुपये थकित असल्याचे दाखवून अनंत पवार यांना मतदान प्रतिनिधी म्हणून अपात्र ठरविले. मात्र त्याच तारखेला शीर सोसायटीच्या बचत खात्यात 6 लाख 14 हजार 445 रुपये जमा होते.
याबाबत बोलताना अनंत पवार म्हणाले की, जिल्हा बँक त्यांना गरज भासली तर सोसायटीच्या बचत खात्यातून थकबाकी वसुल करते. त्यावेळी संचालकांना वा सचिवाला विचारले जात नाही. मग याचवेळी मतदान प्रतिनिधी म्हणून सोसायटीचा ठराव जाईपर्यंत थकबाकी दाखविण्याचे काम जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी का केले. उलट जिल्हा बँकेच्या संचालकांनी आणि अधिकाऱ्यांनी मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यापूर्वी सोसायट्यांना सांगून अथवा परस्पर सोसायट्यांची थकबाकी पूर्ण करणे आवश्यक होते. ज्या सोसायट्या थकबाकी भरणार नाहीत त्यांचे संचालक कायद्यानुसार अपात्र ठरले असते. अशा थकबाकीदार सोसायट्यांना आपल्या सभासदांमधुन मतदार प्रतिनिधी देण्याची संधी मिळाली असती. या गोष्टी करणे जिल्हा बँकेला सहज शक्य होते.

जिल्हा बँकेची निवडणूक दोन वेळा तांत्रिक कारणांमुळे रद्द झाली. जर जिल्हा बँकेला आपले मतदार अपात्र होवू नयेत असे वाटत असते तर या कालावधीतही बँक सोसायट्यांशी संपर्क साधू शकली असती. डिसेंबर 2019 मध्ये सोसायट्यांनी नेमलेल्या मतदार प्रतिनिधींना सप्टेंबर 2021 मध्ये म्हणजेच दिड वर्षानी अपात्र करण्याची वेळच आली नसती. म्हणूनच माझा आरोप आहे की, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, गुहागर तालुक्यातील संचालक डॉ. अनिल जोशी, जिल्हा बँकेचे अधिकारी या सर्वांनी संगनमताने तालुक्यातील अडचणीच्या वाटणाऱ्या मतदार प्रतिनिधींना अपात्र ठरविण्याचे कारस्थान रचले आहे.

आम्ही अपात्र ठरल्याचे लक्षात आल्यावर डॉ. चोरगेंशी संपर्क साधला होता. त्यावेळी घरातील जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने डॉ. चोरगे गारगोटीला गेले होते. त्यांनी चार दिवस थांबा असा निरोप दिला. म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही थांबलो. मात्र त्याचवेळी आमचा घात केला गेला. अपिलात जाण्याची आमची संधी नाकारली गेली. परगावी असताना डॉ. चोरगे सालसपणे निरोप पाठवत होते. बँकेच्या अधिकाऱ्यांना आमच्या घरी पाठवत होते. पण त्याच डॉ. चोरगेंनी रत्नागिरीत परतल्यावर रडीचा डाव खेळला. आपल्या घरातील दु:खाचे राजकारण केले. हे गुहागरमधील सहकार क्षेत्रातील मंडळी कधीही विसरणार नाहीत.
