शिरीष दामले, रत्नागिरी | 05.09.2020
1 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी दिनी आणि त्यानंतर येणार्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे स्मरण एखाद्या प्रथेप्रमाणे सोपस्कार उरकावेत तसेच केले जाते. उन्मादी वातावरण निर्माण करून एखाद्या गोष्टीचा ‘इव्हेंट’ करण्याच्या काळात हे स्वाभाविकच म्हणावे लागेल; मात्र यापेक्षा विवेकाचा वेगळा आवाजही आवश्यक असतो. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमीच्या दुरवस्थेबाबत नित्यनेमाने वार्षिक खंत व्यक्त न करता लोकांनी पुढाकार घेऊन याबाबत बरेच काही करता येईल. हे स्मारक टिळकांसारख्या थोर व्यक्तीमत्वाची ओळख सांगेल, अशा पद्धतीने करता येईल असे प्रतिपादन येथे केले आहे. यासाठी टिळकांनी जनजागृतीकरिता सुरू केलेल्या गणेशोत्सवापेक्षा अधिक चांगला कालावधी कोणता…
टिळक पुण्यतिथी आली की, रत्नागिरीतील टिळक जन्मभूमीच्या वाईट अवस्थेबद्दल लिहिले, बोलले जाते. सध्या समाजमाध्यमांवरही पुन्हा पुन्हा लिहिले जाते. निष्कर्ष एकच, या दुरवस्थेबद्दल सार्यांनाच खेद वाटतो. यामुळे ‘नेमेचि येतो मग पावसाळा.. ’च्या धर्तीवर टिळक जन्मस्थानाची दुर्दशा आणि त्याबद्दलच्या अपेक्षा या 1 ऑगस्टच्या दरम्यान व्यक्त होतात. या जोडीला पुढार्यांची भाषणे त्यांनी टिळकांना हारतुरे घालणे आणि तेथे निरनिराळे प्रकल्प होतील, अशी आश्वासने देणे हेही नित्याचे झाले आहे. यावर दोन दिवस गेले की, पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत सारे शांत असते. रत्नागिरीकरांना ही स्थिती खचितच शोभा देणारी नाही.
यावर्षी नेमेचि मांडणारे नव्हेत, असे धनंजय भावे यांनी टिळक जन्मभूमीच्या दुर्दशेबद्दल ‘सकाळ’मध्ये आत्यंतिक कळवळ्याने लिहिले होते. महत्त्वाचे म्हणजे तेथे काय करता येईल, हे सुचवले होते. त्या जोडीला रत्नागिरीतील एक विधिज्ञ आणि सामाजिक स्तरावर काम करणारे विनय परांजपे यांनी त्याहीपुढे जाऊन टिळकांचे जन्मस्थान हा विषय फक्त शासनाचा नाही, तर रत्नागिरीकरांचा आहे असा मुद्दा मांडला. या जन्मस्थानाची देखभाल, दुरुस्ती, जतन, संवर्धन आणि विकास ही रत्नागिरीकरांची जबाबदारी आणि कर्तव्ये आहेत. रत्नागिरीकरांनी ती पार पाडण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भावे यांनी सुमारे एक एकरच्या जन्मस्थानाच्या जागेत काय पद्धतीने विकास करता येईल, हे मांडले होते. त्याची द्विरुक्ती येथे करण्याचे कारण नाही; मात्र याबाबत चर्चा व्हावी. स्थूलमानाने टिळक जन्मस्थानाचा विकास आणि त्याचे व्यवस्थापन हे रत्नागिरीत एखादे ट्रस्ट उभारून करावे, पुरातत्व खाते वा शासकीय यंत्रणा यांच्याशी समन्वय राखून जन्मस्थानाचे संवर्धन करावे लागेल. सरकारकडे नेहमी निधीचा प्रश्न येतो. त्यासाठी लोकांमधूनही निधी उभारता येईल. टिळकांच्या कार्याचे स्मरण होईल, अभिमान वाटेल असे संग्रहालय, ग्रंथालय, प्रदर्शन, टिळकांच्या चरित्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग तेथे रेखाटता येईल अथवा आधुनिक तंत्राने तो जिवंत करता येईल. टिळकांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणार्या स्पर्धा अथवा आणखी काही कार्यक्रम घेता येतील. यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. निधी निश्चितच अपुरा पडणार नाही. टिळक लोकनेते, लोकमान्य खरेच; त्याचबरोबर अत्यंत विद्वान आणि व्यासंगी, पत्रकार, गीतेचे भाष्यकार म्हणूनही थोर होते. त्यांची थोरवी कळेल, असे कायमस्वरूपी काम किंवा एखादे अध्यासनही सुरू करता येईल.
यासाठी एक समिती वा न्यास निर्माण करावा. तालुक्याचे आमदार आणि खासदार शिवाय पुरातत्त्व खात्याचे सर्वोच्च अधिकारी हे या न्यासाचे पदसिद्ध सदस्य, शिवाय जाणकार मंडळींचा यामध्ये समावेश करता येईल. जमवलेला निधी पुरातत्त्व खात्याच्या सल्ल्याने आखलेल्या कार्यक्रमांवर आणि योजनेवर खर्च केला जाईल. त्यावर निगराणी, देखरेख या न्यासाची असल्याने लाल फितीत हा विषय अडकणार नाही. रत्नागिरीचे सुजाण आणि उत्साही जाणकार आमदार उदय सामंत हे यामध्ये फक्त नेते वा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर रत्नागिरीचे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून मोठी कामगिरी बजावू शकतात. तसेच लोकांमधून आलेल्या सूचनांचा साकल्याने विचार करता येईल. पुढच्या वर्षीच्या टिळक पुण्यतिथीपर्यंत रत्नागिरीकरांकडून यासाठी काही ठोस पावले पडली तर जन्मभूमीच्या विकासाबद्दल काही विधायक लिहिण्याची संधी मिळेल. नाहीतर मागील पानावरून खंत पुढील पानावर….